॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥
॥ अथ श्रीमद् भगवद्गीता ॥
॥ अथ पञ्चमोऽध्यायः - अध्याय पाचवा ॥
। संन्यासयोगः ।
संन्यासं कर्मणां कृष्ण
पुनर्योगं च शंससि ।
यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे
ब्रूहि सुनिश्चितम् ॥ १ ॥
मग पार्थु श्रीकृष्णातें म्हणे ।
हां हो हें कैसें तुमचें बोलणें ।
एक होय तरी अंतःकरणें ।
विचारूं ये ॥ १ ॥
मागां सकळ कर्मांचा सन्यासु ।
तुम्हींचि निरोपिला होता बहुवसु ।
तरी कर्मयोगीं केवीं अतिरसु ।
पोखीतसां पुढती ? ॥ २ ॥
ऐसें द्व्यर्थ हें बोलतां ।
आम्हां नेणतयांच्या चित्ता ।
आपुलिये चाडें श्रीअनंता ।
उमजु नोहे ॥ ३ ॥
ऐकें एकसारातें बोधिजे ।
तरी एकनिष्ठचि बोलिजे ।
हें आणिकीं काय सांगिजे ।
तुम्हांप्रति ॥ ४ ॥
तरी याचिलागीं तुमतें ।
म्यां राउळासि विनविलें होतें ।
जें हा परमार्थु ध्वनितें ।
न बोलावा ॥ ५ ॥
परी मागील असो देवा ।
आतां प्रस्तुतीं उकलु देखावा ।
सांगैं दोहींमाजि बरवा ।
मार्गु कवणु ॥ ६ ॥
जो परिणामींचा निर्वाळा ।
अचुंबितु ये फळा ।
आणि अनुष्ठितां प्रांजळा ।
सावियाचि ॥ ७ ॥
जैसें निद्रेचें सुख न मोडे ।
आणि मार्गु तरी बहुसाल सांडे ।
तैसें सोहोकासन सांगडें ।
सोहपें होय ॥ ८ ॥
येणें अर्जुनाचेनि बोलें ।
देवो मनीं रिझले ।
मग होईल ऐकें म्हणितलें ।
संतोषोनियां ॥ ९ ॥
देखा कामधेनु ऐसी माये ।
सदैवा जया होये ।
तो चंद्रुही परी लाहे ।
खेळावया ॥ १० ॥
पाहे पां श्रीशंभूची प्रसन्नता ।
तया उपमन्यूचिया आर्ता ।
काय क्षीराब्धि दूधभाता ।
देइजेचिना ? ॥ ११ ॥
तैसा औदार्याचा कुरुठा ।
श्रीकृष्णु आपु जाहलिया सुभटा ।
कां सर्व सुखांचा वसौटा ।
तोचि नोहावा ? ॥ १२ ॥
एथ चमत्कारु कायसा ।
गोसावी श्रीलक्ष्मीकांतासा ।
आतां आपुलिया सवेसा ।
मागावा कीं ॥ १३ ॥
म्हणौनि अर्जुनें म्हणितलें ।
तें हांसोनि येरें दिधलें ।
तेंचि सांगेन बोलिलें ।
काय कृष्णें ॥ १४ ॥
श्रीभगवानुवाच ।
संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ ।
तयोस्तु कर्मसंन्यासात्कर्मयोगो विशिष्यते ॥ २ ॥
तो म्हणे गा कुंतीसुता ।
हे संन्यासयोगु विचारितां ।
मोक्षकरु तत्त्वता ।
दोनीही होती ॥ १५ ॥
तरी जाणां नेणां सकळां ।
हा कर्मयोगु कीर प्रांजळा ।
जैसी नाव स्त्रियां बाळां ।
तोयतरणी ॥ १६ ॥
तैसें सारासार पाहिजे ।
तरी सोहपा हाचि देखिजे ।
येणें संन्यासफळ लाहिजे ।
अनायासें ॥ १७ ॥
आतां याचिलागीं सांगेन ।
तुज संन्यासियाचें चिन्ह ।
मग सहजें हें अभिन्न ।
जाणसी तूं ॥ १८ ॥
ज्ञेयः स नित्यसंन्यासी
यो न द्वेष्टि न काङ्क्षति ।
निर्द्वन्द्वो हि महाबाहो
सुखं बन्धात्प्रमुच्यते ॥ ३ ॥
तरी गेलियाची से न करी ।
न पवतां चाड न धरी ।
जो सुनिश्चळु अंतरीं ।
मेरु जैसा ॥ १९ ॥
आणि मी माझें ऐसी आठवण ।
विसरलें जयाचें अंतःकरण ।
पार्था तो संन्यासी जाण ।
निरंतर ॥ २० ॥
जो मनें ऐसा जाहला ।
संगीं तोचि सांडिला ।
म्हणौनि सुखें सुख पावला ।
अखंडित ॥ २१ ॥
आतां गृहादिक आघवें ।
तें कांहीं नलगे त्यजावें ।
जें घेतें जाहलें स्वभावें ।
निःसंगु म्हणौनि ॥ २२ ॥
देखैं अग्नि विझोनि जाये ।
मग जे राखोंडी केवळु होये ।
तैं ते कापुसें गिंवसूं ये ।
जियापरी ॥ २३ ॥
तैसा असतेनि उपाधी ।
नाकळिजे तो कर्मबंधीं ।
जयाचिये बुद्धी ।
संकल्पु नाहीं ॥ २४ ॥
म्हणौनि कल्पना जैं सांडे ।
तैंचि गा संन्यासु घडे ।
इयें कारणें दोनी सांगडे ।
संन्यासयोगु ॥ २५ ॥
सांख्ययोगौ पृथग्बालाः
प्रवदन्ति न पण्डिताः ।
एकमप्यास्थितः
सम्यगुभयोर्विन्दते फलम् ॥ ४ ॥
एर्हवीं तरी पार्था ।
जे मूर्ख होती सर्वथा ।
ते सांख्ययोगुसंस्था ।
जाणती केवीं ? ॥ २६ ॥
सहजें ते अज्ञान ।
म्हणौनि म्हणती ते भिन्न ।
एर्हवीं दीपाप्रति काई आनान ।
प्रकाशु आहाती ? ॥ २७ ॥
पैं सम्यक् येणें अनुभवें ।
जिहीं देखिलें तत्त्व आघवें ।
तें दोहींतेंही ऐक्यभावें ।
मानिती गा ॥ २८ ॥
यत्सांख्यैः प्राप्यते स्थानं
तद्योगैरपि गम्यते ।
एकं साख्यं च योगं च
यः पश्यति स पश्चति ॥ ५ ॥
आणि सांख्यीं जें पाविजे ।
तेंचि योगीं गमिजे ।
म्हणौनि ऐक्य दोहींतें सहजें ।
इयापरी ॥ २९ ॥
देखैं आकाशा आणि अवकाशा ।
भेदु नाहीं जैसा ।
तैसें ऐक्य योगसंन्यासा ।
वोळखे जो ॥ ३० ॥
तयासीचि जगीं पाहलें ।
आपणपें तेणेंचि देखिलें ।
जया सांख्ययोग जाणवले ।
भेदेंविण ॥ ३१ ॥
संन्यासस्तु महाबाहो
दुःखमाप्तुमयोगतः ।
योगयुक्तो मुनिर्बह्म न
चिरेणाधिगच्छति ॥ ६ ॥
जो युक्तिपंथें पार्था ।
चढे मोक्षपर्वता ।
तो महासुखाचा निमथा ।
वहिला पावे ॥ ३२ ॥
येरा योगस्थिति जया सांडे ।
तो वायांचि गा हव्यासीं पडे ।
परि प्राप्ति कहीं न घडे ।
संन्यासाची ॥ ३३ ॥
योगयुक्तो विशुद्धात्मा
विजितात्मा जितेन्द्रियः ।
सर्वभूतात्मभूतात्मा
कुर्वन्नपि न लिप्यते ॥ ७ ॥
जेणें भ्रांतीपासूनि हिरतलें ।
गुरुवाक्यें मन धुतलें ।
मग आत्मस्वरूपीं घातलें ।
हारौनियां ॥ ३४ ॥
जैसें समुद्रीं लवण न पडे ।
तंव वेगळें अल्प आवडे ।
मग होय सिंधूचि एवढें ।
मिळे तेव्हां ॥ ३५ ॥
तैसें संकल्पोनि काढिलें ।
जयाचें मनचि चैतन्य जाहलें ।
तेणें एकदेशियें परी व्यापिलें ।
लोकत्रय ॥ ३६ ॥
आतां कर्ता कर्म करावें ।
हें खुंटलें तया स्वभावें ।
आणि करी जर्ही आघवें ।
तर्ही अकर्ता तो ॥ ३७ ॥
नैव किंचित्करोमीति
युक्तो मन्येत तत्त्ववित् ।
पश्यञ्श्रृण्वन्स्पृशञ्जिघ्रन्नश्नन्गच्छन्स्वपन्श्वसन् ॥ ८ ॥
प्रलपन्विसृजन्गृह्णन्नुन्मिषन्निमिषन्नपि ।
इंद्रियाणीन्द्रियार्थेषु
वर्तन्त इति धारयन् ॥ ९ ॥
जे पार्था तया देहीं ।
मी ऐसा आठऊ नाहीं ।
तरी कर्तृत्व कैचैं काई ।
उरे सांगैं ? ॥ ३८ ॥
ऐसें तनुत्यागेंवीण ।
अमूर्ताचे गुण ।
दिसती संपूर्ण ।
योगयुक्तां ॥ ३९ ॥
एर्हवीं आणिकांचिये परी ।
तोही एक शरीरी ।
अशेषाही व्यापारीं ।
वर्ततु दिसे ॥ ४० ॥
तोही नेत्रीं पाहे ।
श्रवणीं ऐकतु आहे ।
परि तेथींचा सर्वथा नोहे ।
नवल देखें ॥ ४१ ॥
स्पर्शासि तरी जाणे ।
परिमळु सेवी घ्राणें ।
अवसरोचित बोलणें ।
तयाहि आथी ॥ ४२ ॥
आहारातें स्वीकारी ।
त्यजावें तें परिहरी ।
निद्रेचिया अवसरीं ।
निदिजे सुखें ॥ ४३ ॥
आपुलेनि इच्छावशें ।
तोही गा चालतु दिसे ।
पैं सकळ कर्म ऐसें ।
रहाटे कीर ॥ ४४ ॥
हें सांगों काई एकैक ।
देखें श्वासोच्छ्वासादिक ।
आणि निमिषोन्निमिष ।
आदिकरूनि ॥ ४५ ॥
पार्था तयाचे ठायीं ।
हें आघवेंचि आथि पाहीं ।
परी तो कर्ता नव्हे कांहीं ।
प्रतीतिबळें ॥ ४६ ॥
जैं भ्रांति सेजे सुतला ।
तैं स्वप्नसुखें भुतला ।
मग तो ज्ञानोदयीं चेइला ।
म्हणौनियां ॥ ४७ ॥
ब्रह्मण्याधाय कर्माणि
सङ्गं त्यक्त्वा करोति यः ।
लिप्यते न स पापेन
पद्मपत्रमिवाम्भसा ॥ १० ॥
आतां अधिष्ठानसंगती ।
अशेषाही इंद्रियवृत्ती ।
आपुलालिया अर्थीं ।
वर्तत आहाती ॥ ४८ ॥
दीपाचेनि प्रकाशें ।
गृहींचे व्यापार जैसे ।
देहीं कर्मजात तैसे ।
योगयुक्ता ॥ ४९ ॥
तो कर्में करी सकळें ।
परी कर्मबंधा नाकळे ।
जैसें न सिंपे जळीं जळें ।
पद्मपत्र ॥ ५० ॥
कायेन मनसा बुद्ध्या
केवलैरिन्द्रियैरपि ।
योगिनः कर्म कुर्वन्ति
सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये ॥ ११ ॥
देखैं बुद्धीची भाष नेणिजे ।
मनाचा अंकुर नुदैजे ।
ऐसा व्यापारु तो बोलिजे ।
शारीरु गा ॥ ५१ ॥
हेंच मराठे परियेशीं ।
तरी बाळकाची चेष्टा जैशी ।
योगिये कर्में करिती तैशीं ।
केवळा तनु ॥ ५२ ॥
मग पांचभौतिक संचलें ।
जेव्हां शरीर असे निदेलें ।
तेथ मनचि रहाटें एकलें ।
स्वप्नीं जेवीं ॥ ५३ ॥
नवल ऐकें धनुर्धरा ।
कैसा वासनेचा संसारा ।
देहा होऊं नेदी उजगरा ।
परी सुखदुःखें भोगी ॥ ५४ ॥
इंद्रियांच्या गांवीं नेणिजे ।
ऐसा व्यापारु जो निपजे ।
तो केवळु गा म्हणिजे ।
मानसाचा ॥ ५५ ॥
योगिये तोही करिती ।
परी कर्में तें न बंधिजती ।
जे सांडिली आहे संगती ।
अहंभावाची ॥ ५६ ॥
आतां जाहालिया भ्रमहत ।
जैसें पिशाचाचें चित्त ।
मग इंद्रियांचें चेष्टित ।
विकळु दिसे ॥ ५७ ॥
स्वरूप तरी देखे ।
आळविलें आइके ।
शब्दु बोले मुखें ।
परी ज्ञान नाहीं ॥ ५८ ॥
हें असो काजेंविण ।
जें जें कांहीं करण ।
तें केवळ कर्म जाण ।
इंद्रियांचें ॥ ५९ ॥
मग सर्वत्र जें जाणतें ।
ते बुद्धीचें कर्म निरुतें ।
ओळख अर्जुनातें ।
म्हणे हरी ॥ ६० ॥
ते बुद्धी धुरे करुनी ।
कर्म करिती चित्त देऊनी ।
परी ते नैष्कर्म्यापासुनी ।
मुक्त दिसती ॥ ६१ ॥
जें बुद्धीचिये ठावूनि देही ।
तयां अहंकाराची सेचि नाहीं ।
म्हणौनि कर्म करितां पाहीं ।
चोखाळले ॥ ६२ ॥
अगा करितेनवीण कर्म ।
तेंचि तें नैष्कर्म्य ।
हें जाणती सुवर्म ।
गुरुगम्य जें ॥ ६३ ॥
आतां शांतरसाचें भरितें ।
सांडीत आहे पात्रातें ।
जें बोलणें बोलापरौतें ।
बोलवलें ॥ ६४ ॥
एथ इंद्रियांचा पांगु ।
जया फिटला आहे चांगु ।
तयासीचि आथि लागु ।
परिसावया ॥ ६५ ॥
हा असो अतिप्रसंगु ।
न संडी पां कथालागु ।
होईल श्लोकसंगति भंगु ।
म्हणौनियां ॥ ६६ ॥
जें मना आकळितां कुवाडें ।
घाघुसितां बुद्धी नातुडे ।
तें दैवाचेनि सुरवाडें ।
सांगवलें तुज ॥ ६७ ॥
जें शब्दातीत स्वभावें ।
तें बोलींचि जरी फावे ।
तरी आणिकें काय करावें ।
कथा सांगैं ॥ ६८ ॥
हा आर्तिविशेषु श्रोतयांचा ।
जाणोनि दास निवृत्तीचा ।
म्हणे संवादु दोघांचा ।
परिसोनि परिसा ॥ ६९ ॥
मग श्रीकृष्ण म्हणे पार्थातें ।
आतां प्राप्ताचें चिन्ह पुरतें ।
सांगेन तुज निरुतें ।
चित्त देईं ॥ ७० ॥
युक्तः कर्मफलं त्यक्त्वा
शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् ।
अयुक्तः कामकारेण फले
सक्तो निबध्यते ॥ १२ ॥
तरी आत्मयोगें आथिला ।
जो कर्मफळाशीं विटला ।
तो घर रिघोनि वरिला ।
शांति जगीं ॥ ७१ ॥
येरु कर्मबंधें किरीटी ।
अभिलाषाचिया गांठीं ।
कळासला खुंटी ।
फळभोगाच्या ॥ ७२ ॥
सर्वकर्माणि मनसा
संन्यस्यास्ते सुखं वशी ।
नवद्वारे पुरे देही
नैव कुर्वन्न कारयन् ॥ १३ ॥
जैसा फळाचिये हांवें ।
तैसें कर्म करी आघवें ।
मग न कीजेचि येणें भावें ।
उपेक्षी जो ॥ ७३ ॥
तो जयाकडे वासु पाहे ।
तेउती सुखाची सृष्टि होये ।
तो म्हणे तेथ राहे ।
महाबोधु ॥ ७४ ॥
नवद्वारें देहीं ।
तो असतुचि परि नाहीं ।
करितुचि न करी कांहीं ।
फलत्यागी ॥ ७५ ॥
न कर्तृत्वं न कर्माणि
लोकस्य सृजति प्रभुः ।
न कर्मफलसंयोगं
स्वभावस्तु प्रवर्तते ॥ १४ ॥
जैसा कां सर्वेश्वरू ।
पाहिजे तंव निर्व्यापारु ।
परि तोचि रची विस्तारु ।
त्रिभुवनाचा ॥ ७६ ॥
आणि कर्ता ऐसें म्हणिपे ।
तरी कवणें कर्मीं न शिंपें ।
जे हातुपावो न लिंपे ।
उदासवृत्तीचा ॥ ७७ ॥
योगनिद्रा तरी न मोडे ।
अकर्तेपणा सळु न पडे ।
परी महाभूतांचें दळवाडें ।
उभारी भले ॥ ७८ ॥
जगाच्या जीवीं आहे ।
परी कवणाचा कहीं नोहे ।
जगचि हें होय जाये ।
तो शुद्धीहि नेणे ॥ ७९ ॥
नादत्ते कस्यचित्पापं
न चैव सुकृतं विभुः ।
अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन
मुह्यन्ति जन्तवः ॥ १५ ॥
पापपुण्यें अशेषें ।
पासींचि असतु न देखें ।
आणि साक्षीही होऊं न ठके ।
येरी गोठी कायसी ? ॥ ८० ॥
पैं मूर्तीचेनि मेळें ।
तो मूर्तचि होऊनि खेळे ।
परि अमूर्तपण न मैळे ।
दादुलयाचें ॥ ८१ ॥
तो सृजी पाळी संहारी ।
ऐसें बोलती जे चराचरीं ।
तें अज्ञान गा अवधारीं ।
पंडुकुमरा ॥ ८२ ॥
ज्ञानेन तु तदज्ञानं
येषां नाशितमात्मनः ।
तेषामादित्यवज्ञानं
प्रकाशयति तत्परम् ॥ १६ ॥
तें अज्ञान जैं समूळ तुटे ।
तै भ्रांतीचें मसैरें फिटे ।
मग अकर्तृत्व प्रगटे ।
मज ईश्वराचें ॥ ८३ ॥
एथ ईश्वरु एकु अकर्ता ।
ऐसें मानलें जरी चित्ता ।
तरी तोचि मी हें स्वभावता ।
आदीचि आहे ॥ ८४ ॥
ऐसेनि विवेकें उदो चित्तीं ।
तयासी भेदु कैंचा त्रिजगतीं ।
देखें आपुलिया प्रतीति ।
जगचि मुक्त ॥ ८५ ॥
जैशी पूर्वदिशेच्या राउळीं ।
उदया येतांचि सूर्य दिवाळी ।
कीं येरीही दिशां तियेचि काळीं ।
काळिमा नाहीं ॥ ८६ ॥
तद्बुद्धयस्तदात्मानः
तन्निष्ठातत्परायणः ।
गच्छन्त्यपुनरावृत्ति
ज्ञाननिर्धूतकल्मषाः ॥ १७ ॥
बुद्धिनिश्चयें आत्मज्ञान ।
ब्रह्मरूप भावी आपणा आपण ।
ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण ।
तत्परायण अहर्निशीं ॥ ८७ ॥
ऐसें व्यापक ज्ञान भलें ।
जयांचिया हृदया गिंवसित आलें ।
तयांची समता दृष्टि बोलें ।
विशेषूं काई ॥ ८८ ॥
एक आपणपांचि जैसें ।
ते देखतीं विश्व तैसें ।
हें बोलणें कायसें ।
नवलु एथ ॥ ८९ ॥
परी दैव जैसें कवतिकें ।
कहींचि दैन्य न देखे ।
कां विवेकु हा नोळखे ।
भ्रांतीतें जेवीं ॥ ९० ॥
नातरी अंधकाराची वानी ।
जैसा सूर्यो न देखे स्वप्नीं ।
अमृत नायके कानीं ।
मृत्युकथा ॥ ९१ ॥
हें असो संतापु कैसा ।
चंद्रु न स्मरे जैसा ।
भूतीं भेदु नेणती तैसा ।
ज्ञानिये ते ॥ ९२ ॥
विद्याविनयसंपन्ने
ब्राह्मणे गवि हस्तिनि ।
शुनि चैव श्वपाके च
पण्डिताः समदर्शिनः ॥ १८ ॥
मग हा मशकु हा गजु ।
कीं हा श्वपचु हा द्विजु ।
पैल इतरु हा आत्मजु ।
हें उरेल कें ? ॥ ९३ ॥
ना तरी हे धेनु हें श्वान ।
एक गुरु एक हीन ।
हें असो कैचें स्वप्न ।
जागतया ॥ ९४ ॥
एथ भेदु तरी कीं देखावा ।
जरी अहंभाव उरला होआवा ।
तो आधींचि नाहीं आघवा ।
आतां विषमु काई ॥ ९५ ॥
इहैव तैर्जितः सर्गो
येषां साम्ये स्थितं मनः ।
निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद्
ब्रह्मणि ते स्थिताः ॥ १९ ॥
म्हणौनि सर्वत्र सदा सम ।
तें आपणचि अद्वय ब्रह्म ।
हें संपूर्ण जाणें वर्म ।
समदृष्टीचें ॥ ९६ ॥
जिहीं विषयसंगु न सांडितां ।
इंद्रियांतें न दंडितां ।
परी भोगिली निसंगता ।
कामनेविण ॥ ९७ ॥
जिहीं लोकांचेनि आधारें ।
लौकिकेंचि व्यापारें ।
परि सांडिलें निदसुरें ।
लौकिकु हें ॥ ९८ ॥
जैसा जनामाजि खेचरु ।
असतुचि जना नोहे गोचरु ।
तैसा शरीरीं परी संसारु ।
नोळखे तयांतें ॥ ९९ ॥
हें असो पवनाचेनि मेळें ।
जैसें जळींचि जळ लोळे ।
तें आणिकें म्हणती वेगळें ।
कल्लोळ हे ॥ १०० ॥
तैसें नाम रूप तयाचें ।
एर्हवीं ब्रह्मचि तो साचें ।
मन साम्या आलें जयाचें ।
सर्वत्र गा ॥ १०१ ॥
ऐसेनि समदृष्टी जो होये ।
तया पुरुषा लक्षणही आहे ।
अर्जुना संक्षेपें सांगेन पाहें ।
अच्युत म्हणे ॥ १०२ ॥
न प्रहृष्येत्प्रियं प्राप्य
नोद्विजेत्प्राप्य चाप्रियम् ।
स्थिरबुद्धिरसंमूढो
ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः ॥ २० ॥
तरी मृगजळाचेनि पूरें ।
जैसें न लोटिजे कां गिरिवरें ।
तैसा शुभाशुभीं न विकरे ।
पातलिया जो ॥ १०३ ॥
तोचि तो निरुता ।
समदृष्टी तत्त्वतां ।
हरि म्हणे पंडुसुता ।
तोचि ब्रह्म ॥ १०४ ॥
बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा
विन्दत्यात्मनि यत्सुखम् ।
स ब्रह्मयोगयुक्तात्मा
सुखमक्षयमश्नुते ॥ २१ ॥
जया आपणपें सांडूनि कहीं ।
इंद्रियग्रामावरी येणेंचि नाहीं ।
तो विषय न सेवी हें काई ।
विचित्र येथ ॥ १०५ ॥
सहजें स्वसुखाचेनि अपारें ।
सुरवाडलेनि अंतरें ।
रचिला म्हणौनि बाहिरें ।
पाउल न घाली ॥ १०६ ॥
सांगैं कुमुददळाचेनि ताटें ।
जो जेविला चंद्रकिरणें चोखटें ।
तो चकोरु काई वाळुवंटें ।
चुंबितु असे ? ॥ १०७ ॥
तैसें आत्मसुख उपाइलें ।
जयासि आपणपेंचि फावलें ।
तया विषयो सहजें सांडवले ।
म्हणो काई ? ॥ १०८ ॥
एर्हवीं तरी कौतुकें ।
विचारूनि पाहें पां निकें ।
या विषयांचेनि सुखें ।
झकविती कवण ॥ १०९ ॥
ये हि संस्पर्शजा भोगा
दुःखयोनय एव ते ।
आद्यन्तवन्तः कौन्तेय न
तेषु रमते बुधः ॥ २२ ॥
जिहीं आपणपें नाहीं देखिलें ।
तेचि इहीं इंद्रियार्थीं रंजले ।
जैसें रंकु कां आळुकैलें ।
तुषांतें सेवी ॥ ११० ॥
नातरी मृगें तृषापीडितें ।
संभ्रमें विसरोनि जळांतें ।
मग तोयबुद्धी बरडीतें ।
ठाकूनि येती ॥ १११ ॥
तैसें आपणपें नाहीं दिठे ।
जयातें स्वसुखाचे सदा खरांटे ।
तयासीचि विषय हे गोमटे ।
आवडती ॥ ११२ ॥
एर्हवीं विषयीं सुख आहे ।
हे बोलणेंचि सारिखें नोहे ।
तरी विद्युत्स्फुरणें कां न पाहे ।
जगामाजीं ॥ ११३ ॥
सांगैं वात वर्ष आतपु धरे ।
ऐसे अभ्रच्छायाचि जरी सरे ।
तरी त्रिमाळिकें धवळारें ।
करावीं कां ॥ ११४ ॥
म्हणौनि विषयसुख जें बोलिजे ।
तें नेणतां गा वायां जल्पिजे ।
जैसें महूर कां म्हणिजे ।
विषकंदातें ॥ ११५ ॥
नातरी भौमा नाम मंगळु ।
रोहिणीतें म्हणती जळु ।
तैसा सुखप्रवादु बरळु ।
विषयिकु हा ॥ ११६ ॥
हे असो आघवी बोली ।
सांग पां सर्पफणीचा साउली ।
ते शीतल होईल केतुली ।
मूषकासी ? ॥ ११७ ॥
जैसा आमिषकवळु पांडवा ।
मीनु न सेवी तंवचि बरवा ।
तैसा विषयसंगु आघवा ।
निभ्रांत जाणें ॥ ११८ ॥
हे विरक्तांचिये दिठी ।
जैं न्याहाळिजे किरीटी ।
तैं पांडुरोगाचिये पुष्टी- ।
सारिखें दिसे ॥ ११९ ॥
म्हणौनि विषयभोगीं जें सुख ।
तें साद्यंतचि जाण दुःख ।
परि काय कीजे मूर्ख ।
न सेवितां न सरे ॥ १२० ॥
तें अंतर नेणती बापुडे ।
म्हणौनि अगत्य सेवणें घडे ।
सांगैं पूयपंकींचे किडे ।
काय चिळसी घेती ॥ १२१ ॥
तयां दुःखियां दुःखचि जिव्हार ।
ते विषयकर्दमींचे दर्दुर ।
ते भोगजळींचे जळचर ।
सांडिती केवीं ॥ १२२ ॥
आणि दुःखयोनि जिया आहाती ।
तिया निरर्थका तरी नव्हती ।
जरी विषयांवरी विरक्ती ।
धरिती जीव ॥ १२३ ॥
नातरी गर्भवासादि संकट ।
कां जन्ममरणींचे कष्ट ।
हे विसांवेवीण वाट ।
वाहावी कवणें ॥ १२४ ॥
जरी विषयीं विषयो सांडिजेल ।
तरी महादोषीं कें वसिजेल ।
आणि संसारु हा शब्दु नव्हेल ।
लटिका जगीं ? ॥ १२५ ॥
म्हणौनि अविद्याजात नाथिलें ।
तें तिहींचि साच दाविलें ।
जिहीं सुखबुद्धी घेतलें ।
विषयदुःख ॥ १२६ ॥
या कारणें गा सुभटा ।
हा विचारितां विषय वोखटा ।
तूं झणें कहीं या वाटा ।
विसरोनि जाशी ॥ १२७ ॥
पैं यातें विरक्त पुरुष ।
त्यजिती कां जैसें विष ।
निराशा तयां दुःख ।
दाविलें नावडे ॥ १२८ ॥
शक्नोतीहैव यः सोढुं
प्राक्शरीरविमोक्षणात् ।
कामक्रोधोद्भवं वेगं
स युक्तः स सुखी नरः ॥ २३ ॥
ज्ञानियांच्या हन ठायीं ।
याची मातुही कीर नाहीं ।
देहीं देहभावो जिहीं ।
स्ववश केले ॥ १२९ ॥
जयांतें बाह्याची भाष ।
नेणिजेचि निःशेष ।
अंतरीं सुख ।
एक आथि ॥ १३० ॥
परि तें वेगळेपणें भोगिजे ।
जैसें पक्षियें फळ चुंबिजे ।
तैसें नव्हे तेथ विसरिजे ।
भोगितेपणही ॥ १३१ ॥
भोगीं अवस्था एकी उठी ।
ते अहंकाराचा अंचळु लोटी ।
मग सुखेंसि घे आंटी ।
गाढेपणें ॥ १३२ ॥
तिये आलिंगनमेळीं ।
होय आपेंआप कवळी ।
तेथ जळ जैसें जळीं ।
वेगळें न दिसे ॥ १३३ ॥
कां आकाशीं वायु हारपे ।
तेथ दोन्ही हे भाष लोपे ।
तैसे सुखचि उरे स्वरूपें ।
सुरतीं तिये ॥ १३४ ॥
ऐसी द्वैताची भाष जाय ।
मग म्हणों जरी एक होय ।
तरी तेथ साक्षी कवणु आहे ।
जाणते जें ॥ १३५ ॥
योऽन्तःसुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव यः ।
स योगी ब्रह्मनिर्वाणं
ब्रह्मभूतोऽधिगच्छति ॥ २४ ॥
लभन्ते ब्रह्मनिर्वाणमृषयः
क्षीणकल्मषाः ।
छिन्नद्वैधा यतात्मानः
सर्वभूतहिते रताः ॥ २५ ॥
म्हणौनि असो हें आघवें ।
एथ न बोलणें काय बोलावें ।
ते खुणाचि पावले स्वभावें ।
आत्माराम ॥ १३६ ॥
जे ऐसेनि सुखें मातले ।
आपणपांचि आपण गुंतले ।
ते मी जाणें निखिळ वोतले ।
सामरस्याचे ॥ १३७ ॥
ते आनंदाचे अनुकार ।
सुखाचे अंकुर ।
कीं महाबोधें विहार ।
केले जैसे ॥ १३८ ॥
ते विवेकाचें गांव ।
कीं परब्रह्मींचे स्वभाव ।
नातरी अळंकारले अवयव ।
ब्रह्मविद्येचे ॥ १३९ ॥
ते सत्त्वाचे सात्त्विक ।
कीं चैतन्याचे आंगिक ।
हें बहु असो एकैक ।
वानिसी काई ॥ १४० ॥
तूं संतस्तवनीं रतसी ।
तरी कथेची से न करिसी ।
कीं निराळीं बोल देखसी ।
सनागर ॥ १४१ ॥
परि तो रसातिशयो मुकुळीं ।
मग ग्रंथार्थदीपु उजळीं ।
करी साधुहृदयराउळीं ।
मंगळउखा ॥ १४२ ॥
ऐसा श्रीगुरूचा उवायिला ।
निवृत्तिदासासी पातला ।
मग तो म्हणे श्रीकृष्ण बोलिला ।
तेंचि आइका ॥ १४३ ॥
अर्जुना अनंत सुखाच्या डोहीं ।
एकसरा तळुचि घेतला जिहीं ।
मग स्थिराऊनि तेही ।
तेंचि जाहले ॥ १४४ ॥
अथवा आत्मप्रकाशें चोखें ।
जो आपणपेंचि विश्व देखे ।
तो देहेंचि परब्रह्म सुखें ।
मानूं येईल ॥ १४५ ॥
जें साचोकारें परम ।
ना तें अक्षर निःसीम ।
जिये गांवींचे निष्काम ।
अधिकारिये ॥ १४६ ॥
जे महर्षीं वाढले ।
विरक्तां भागा फिटलें ।
जे निःसंशया पिकलें ।
निरंतर ॥ १४७ ॥
कामक्रोधवियुक्तानां
यतीनां यतचेतसाम् ।
अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते
विदितात्मनाम् ॥ २६ ॥
जिहीं विषयांपासोनि हिरतलें ।
चित्त आपुलें आपण जिंतिलें ।
ते निश्चित जेथ सुतले ।
चेतीचिना ॥ १४८ ॥
तें परब्रह्म निर्वाण ।
जें आत्मविदांचें कारण ।
तेंचि ते पुरुष जाण ।
पंडुकुमरा ॥ १४९ ॥
ते ऐसे कैसेंनि जहाले ।
जे देहींचि ब्रह्मत्वा आले ।
हें पुससी तरी भलें ।
संक्षेपें सांगों ॥ १५० ॥
स्पर्शान्कृत्वा
बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः ।
प्राणापानौ समौ कृत्वा
नासाभ्यन्तरचारिणौ ॥ २७ ॥
यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः ।
विगतेच्छाभयक्रोधो
यः सदा मुक्त एव सः ॥ २८ ॥
तरी वैराग्याचेनि आधारें ।
जिहीं विषय दवडूनि बाहिरें ।
शरीरीं एकंदरें ।
केलें मन ॥ १५१ ॥
सहजें तिहीं संधी भेटी ।
जेथ भ्रूपल्लवां पडे गांठी ।
तेथ पाठिमोरी दिठी ।
पारखोनियां ॥ १५२ ॥
सांडूनि दक्षिण वाम ।
प्राणापानसम ।
चित्तेंसीं व्योम- ।
गामिये करिती ॥ १५३ ॥
तेथ जैसीं रथ्योदकें सकळें ।
घेऊनि गंगा समुद्रीं मिळे ।
मग एकेकु वेगळें ।
निवडूं नये ॥ १५४ ॥
तैसी वासनांतराची विवंचना ।
मग आपैसी पारुखे अर्जुना ।
जे वेळीं गगनीं लयो मना ।
पवनें कीजे ॥ १५५ ॥
जेथ हें संसारचित्र उमटे ।
तो मनोरूपु पटु फाटे ।
जैसें सरोवर आटे ।
मग प्रतिभा नाहीं ॥ १५६ ॥
तैसें मन एथ मुद्दल जाय ।
मग अहंभावादिक कें आहे ।
म्हणौनि शरीरेंचि ब्रह्म होये ।
अनुभवी तो ॥ १५७ ॥
भोक्तारं यज्ञतपसां
सर्वलोकमहेश्वरम् ।
सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा
मां शान्तिमृच्छति ॥ २९ ॥
ॐ तत्सदिति श्रीमद्भजगवद्गीता
सूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे
कर्मसंज्ञासयोगोनाम पंचमोऽध्यायः ॥ ५ ॥
आम्हीं मागां हन सांगितलें ।
जे देहींचि ब्रह्मत्व पावले ।
ते येणें मार्गें आले ।
म्हणौनियां ॥ १५८ ॥
आणि यमनियमांचे डोंगर ।
अभ्यासाचे सागर ।
क्रमोनि हे पार ।
पातले ते ॥ १५९ ॥
तिहीं आपणपें करूनि निर्लेप ।
प्रपंचाचें घेतलें माप ।
मग साचाचेंचि रूप ।
होऊनि ठेले ॥ १६० ॥
ऐसा योगयुक्तीचा उद्देशु ।
जेथ बोलिला हृषीकेशु ।
तेथ अर्जुनु सुदंशु ।
म्हणौनि चमत्कारला॥ १६१ ॥
तें देखिलिया कृष्णें जाणितलें ।
मग हांसोनि पार्थातें म्हणितलें ।
काई पां चित्त उवाइलें ।
इये बोलीं तुझें ? ॥ १६२ ॥
तंव अर्जुन म्हणे देवो ।
परचित्तलक्षणांचा रावो ।
भला जाणितला जी भावो ।
मानसु माझा ॥ १६३ ॥
म्यां जें कांहीं विवरोनि पुसावें ।
तें आधींचि जाणितलें देवें ।
तरी बोलिलें तेंचि सांगावें ।
विवळ करूनि ॥ १६४ ॥
एर्हवीं तरी अवधारा ।
जो दाविला तुम्हीं अनुसारा ।
तो पव्हण्याहूनि पायउतारा ।
सोहपा जैसा ॥ १६५ ॥
तैसा सांख्याहूनि प्रांजळा ।
परी आम्हांसारिखियां अभोळां ।
एथ आहाति परि कांहीं काळा ।
तो साहों ये वर ॥ १६६ ॥
म्हणौनि एक वेळ देवा ।
तोचि पडताळा घेयावा ।
विस्तरेल तरी सांगावा ।
साद्यंतुचि॥ १६७ ॥
तंव श्रीकृष्ण म्हणती हो कां ।
तुज हा मार्गु गमला निका ।
तरी काय जाहलें आईकीजो कां ।
सुखें बोलों॥ १६८ ॥
अर्जुना तूं परिससी ।
परिसोनि अनुष्ठिसी ।
तरी आम्हांसीचि वानी कायसी ।
सांगावयाची ? ॥ १६९ ॥
आधींचि चित्त मायेचें ।
वरी मिष जाहले पढियंतयाचें ।
आतां तें अद्भुतपण स्नेहाचें ।
कवण जाणे ॥ १७० ॥
तें म्हणो कारुण्यरसाची वृष्टि ।
कीं नवया स्नेहाची सृष्टि ।
हें असो नेणिजे दृष्टी ।
हरीची वानूं ॥ १७१ ॥
जे अमृताची वोतली ।
कीं प्रेमचि पिऊनि मातली ।
म्हणौनि अर्जुनमोहें गुंतली ।
निघों नेणें ॥ १७२ ॥
हें बहु जें जें जल्पिजेल ।
तेथें कथेसि फांकु होईल ।
परि तें स्नेहरूपा न येल ।
बोलवरी॥ १७३ ॥
म्हणौनि विसुरा काय येणें ।
तो ईश्वरु कवळावा कवणें ।
जो आपुलें मान नेणें ।
आपणचि॥ १७४ ॥
तरी मागीला ध्वनीआंतु ।
मज गमला सावियाचि मोहितु ।
जे बलात्कारें असे म्हणतु ।
परिस बापा ॥ १७५ ॥
अर्जुना जेणें जेणें भेदें ।
तुझें कां चित्त बोधे ।
तैसें तैसें विनोदें ।
निरूपिजेल ॥ १७६ ॥
तो काइसया नाम योगु ।
तयाचा कवण उपेगु ।
अथवा अधिकारप्रसंगु ।
कवणा येथ ॥ १७७ ॥
ऐसें जें जें कांहीं ।
उक्त असे इये ठाईं ।
तें आघवेंचि पाहीं ।
सांगेन आतां ॥ १७८ ॥
तूं चित्त देऊनि अवधारीं ।
ऐसें म्हणौनि श्रीहरी ।
बोलिजेल ते पुढारी ।
कथा आहे ॥ १७९ ॥
श्रीकृष्ण अर्जुनासी संगु ।
न सांडोनि सांगेल योगु ।
तो व्यक्त करूं प्रसंगु ।
म्हणे निवृत्तिदासु ॥ १८० ॥
इति श्रीज्ञानदेवविरचितायां
भावार्थदीपिकायां पंचमोऽध्यायः ॥