॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥
॥ अथ श्रीमद् भगवद्गीता ॥
। अथ द्वितीयोऽध्यायः - अध्याय दुसरा ।
। साङ्ख्ययोगः ।
संजय उवाच ।
तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणम् ।
विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः ॥ १ ॥
मग संजयो म्हणे रायातें ।
आईके तो पार्थु तेथें ।
शोकाकुल रुदनातें ।
करितु असे ॥ १ ॥
तें कुळ देखोनि समस्त ।
स्नेह उपनलें अद्भुत ।
तेणें द्रवलें असे चित्त ।
कवणेपरी ॥ २ ॥
जैसें लवण जळें झळंबलें ।
ना तरी अभ्र वातें हाले ।
तैसें सधीर परी विरमलें ।
हृदय तयाचें ॥ ३ ॥
म्हणौनि कृपा आकळिला ।
दिसतसे अति कोमाइला ।
जैसा कर्दमीं रुपला ।
राजहंस ॥ ४ ॥
तयापरी तो पांडुकुमरु ।
महामोहें अति जर्जरु ।
देखोनि श्रीशारङ्गधरु ।
काय बोले ॥ ५ ॥
श्रीभगवानुवाच ।
कुतस्त्वा कश्मलमिदं
विषमे समुपस्थितम् ।
अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन ॥ २ ॥
म्हणे अर्जुना आदि पाहीं ।
हें उचित काय इये ठायीं ।
तूं कवण हें कायी ।
करीत आहासी ॥ ६ ॥
तुज सांगे काय जाहलें ।
कवण उणें आलें ।
करितां काय ठेलें ।
खेदु कायिसा ॥ ७ ॥
तूं अनुचिता चित्त नेदिसी ।
धीरु कहीं न संडिसी ।
तुझेनि नामें अपयशी ।
दिशा लंघिजे ॥ ८ ॥
तूं शूरवृत्तीचा ठावो ।
क्षत्रियांमाजीं रावो ।
तुझिया लाठेपणाचा आवो ।
तिहीं लोकीं ॥ ९ ॥
तुवां संग्रामीं हरु जिंकिला ।
निवातकवचांचा ठावो फेडिला ।
पवाडा तुवां केला ।
गंधर्वांसीं ॥ १० ॥
पाहतां तुझेनि पाडें ।
दिसे त्रैलोक्यही थोकडें ।
ऐसें पुरुषत्व चोखडें ।
पार्था तुझें ॥ ११ ॥
तो तूं कीं आजि एथें ।
सांडूनियां वीरवृत्तीतें ।
अधोमुख रुदनातें ।
करितु आहासी ॥ १२ ॥
विचारी तूं अर्जुनु ।
कीं कारुण्यें किजसी दीनु ।
सांग पां अंधकारें भानु ।
ग्रासिला आथी ? ॥ १३ ॥
ना तरी पवनु मेघासी बिहे ? ।
कीं अमृतासी मरण आहे ? ।
पाहें पां इंधनचि गिळोनि जाये ।
पावकातें ? ॥ १४ ॥
कीं लवणेंचि जळ विरे ? ।
संसर्गें काळकूट मरे ? ।
सांग पां महाफणी दर्दुरें ।
गिळिजे कायी ? ॥ १५ ॥
सिंहासी झोंबे कोल्हा ।
ऐसा अपाडु आथि कें जाहला ? ।
परी तो त्वां साच केला ।
आजि एथ ॥ १६ ॥
म्हणौनि अझुनी अर्जुना ।
झणें चित्त देसी या हीना ।
वेगीं धीर करूनियां मना ।
सावधु होई ॥ १७ ॥
सांडीं हें मूर्खपण ।
उठीं घे धनुष्यबाण ।
संग्रामीं हें कवण ।
कारुण्य तुझें ? ॥ १८ ॥
हां गा तूं जाणता ।
तरी न विचारिसी कां आतां ।
सांगें झुंजावेळे सदयता ।
उचित कायी ? ॥ १९ ॥
हे असतीये कीर्तीसी नाशु ।
आणि पारत्रिकासी अपभ्रंशु ।
म्हणे जगन्निवासु ।
अर्जुनातें ॥ २० ॥
क्लैब्यं मा स्म गमः
पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते ।
क्षुद्रं हृदयदौर्बल्यं
त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप ॥ ३ ॥
म्हणौनि शोकु न करी ।
तूं पुरता धीरु धरीं ।
हें शोच्यता अव्हेरीं ।
पंडुकुमरा ॥ २१ ॥
तुज नव्हे हें उचित ।
येणें नासेल जोडलें बहुत ।
तूं अझुनी वरी हित ।
विचारीं पां ॥ २२ ॥
येणें संग्रामाचेनि अवसरें ।
एथ कृपाळूपण नुपकरे ।
हे आतांचि काय सोयरे ।
जाहले तुज ? ॥ २३ ॥
तूं आधींचि काय नेणसी ? ।
कीं हे गोत्रज नोळखसी ? ।
वायांचि काय करिसी ।
अतिशो आतां ? ॥ २४ ॥
आजिचें हें झुंज ।
काय जन्मा नवल तुज ? ।
हें परस्परें तुम्हां व्याज ।
सदांचि आथी ॥ २५ ॥
तरी आतां काय जाहलें ।
कायि स्नेह उपनलें ।
हें नेणिजे परी कुडें केलें ।
अर्जुना तुवां ॥ २६ ॥
मोहो धरिलीया ऐसें होईल ।
जे असती प्रतिष्ठा जाईल ।
आणि परलोकही अंतरेल ।
ऐहिकेंसी ॥ २७ ॥
हृदयाचें ढिलेपण ।
एथ निकयासी नव्हे कारण ।
हें संग्रामीं पतन जाण ।
क्षत्रियांसीं ॥ २८ ॥
ऐसेनि तो कृपावंतु ।
नानापरी असे शिकवितु ।
हें ऐकोनि पंडुसुतु ।
काय बोले ॥ २९ ॥
अर्जुन उवाच ।
कथं भीष्ममहं संख्ये
द्रोणं च मधुसूदन ।
इषुभिः प्रति योत्स्यामि
पूजार्हावरिसूदन ॥ ४ ॥
देवा हें येतुलेवरी ।
बोलावें नलगे अवधारीं ।
आधीं तूंचि विचारीं ।
संग्रामु हा ॥ ३० ॥
हें झुंज नव्हे प्रमादु ।
एथ प्रवर्तलिया दिसतसे बाधु ।
हा उघड लिंगभेदु ।
वोढवला आम्हां ॥ ३१ ॥
देखें मातापितरें अर्चिजती ।
सर्वस्वें तोषु पावविजती ।
तिये पाठीं केवीं वधिजती ।
आपुलिया हातीं ॥ ३२ ॥
देवा संतवृंद नमस्कारिजे ।
कां घडे तरी पूजिजे ।
हें वांचूनि केवीं निंदिजे ।
स्वयें वाचा ? ॥ ३३ ॥
तैसे गोत्रगुरु आमुचे ।
हे पूजनीय आम्हां नियमाचे ।
मज बहुत भीष्मद्रोणांचें ।
वर्ततसे ॥ ३४ ॥
जयांलागीं मनें विरूं ।
आम्ही स्वप्नींही न शकों धरूं ।
तयां प्रत्यक्ष केवीं करूं ।
घातु देवा ? ॥ ३५ ॥
वरी जळो हें जियालें ।
एथ आघवेयांसि हेंचि काय जाहले ।
जे यांच्या वधीं अभ्यासिले ।
मिरविजे आम्हीं ॥ ३६ ॥
मी पार्थु द्रोणाचा केला ।
येणें धनुर्वेदु मज दिधला ।
तेणें उपकारें काय आभारैला ।
वधी तयातें ? ॥ ३७ ॥
जेथींचिया कृपा लाहिजे वरु ।
तेथेंचि मनें व्यभिचारु ।
तरी काय मी भस्मासुरु ।
अर्जुन म्हणे ॥ ३८ ॥
गुरुनहत्वा हि महानुभावान्
श्रेयो भोक्तुं भैक्ष्यमपीह लोके ।
हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुञ्जीय
भोगान् रुधिरप्रदिग्धान् ॥ ५ ॥
देवा समुद्र गंभीर आइकिजे ।
वरि तोहि आहाच देखिजे ।
परी क्षोभु मनीं नेणिजे ।
द्रोणाचिये ॥ ३९ ॥
हें अपार जें गगन ।
वरी तयाही होईल मान ।
परि अगाध भलें गहन ।
हृदय याचें ॥ ४० ॥
वरी अमृतही विटे ।
कीं काळवशें वज्रही फुटे ।
परी मनोधर्मु न लोटे ।
विकरविलाही ॥ ४१ ॥
स्नेहालागीं माये ।
म्हणिपे तें कीरु होये ।
परी कृपा ते मूर्त आहे ।
द्रोणीं इये ॥ ४२ ॥
हा कारुण्याची आदि ।
सकल गुणांचा निधि ।
विद्यासिंधु निरवधि ।
अर्जुन म्हणे ॥ ४३ ॥
हा येणें मानें महंतु ।
वरी आम्हांलागीं कृपावंतु ।
आतां सांग पां येथ घातु ।
चिंतूं येईल ॥ ४४ ॥
ऐसे हे रणीं वधावे ।
मग आपण राज्यसुख भोगावें ।
तें मना न ये आघवें ।
जीवितेसीं ॥ ४५ ॥
हें येणें मानें दुर्धर ।
जे याहीहुनी भोग सधर ।
ते असतु येथवर ।
भिक्षा मागतां भली ॥ ४६ ॥
ना तरी देशत्यागें जाइजे ।
कां गिरिकंदर सेविजे ।
परी शस्त्र आतां न धरिजे ।
इयांवरी ॥ ४७ ॥
देवा नवनिशतीं शरीं ।
वावरोनी यांच्या जिव्हारीं ।
भोग गिंवसावे रुधिरीं ।
बुडाले जे ॥ ४८ ॥
ते काढूनि काय किजती ? ।
लिप्त केवी सेविजती ? ।
मज नये हे उपपत्ती ।
याचिलागीं ॥ ४९ ॥
ऐसें अर्जुन तिये अवसरी ।
म्हणे श्रीकृष्णा अवधारीं ।
परी तें मना नयेचि मुरारी ।
आइकोनियां ॥ ५० ॥
हें जाणोनि पार्थु बिहाला ।
मग पुनरपि बोलों लागला ।
म्हणे देवो कां चित्त या बोला ।
देतीचिना ॥ ५१ ॥
न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो
यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः ।
यानेव हत्वा न जिजीविषामस्तेऽवस्थिताः
प्रमुखे धार्तराष्ट्राः ॥ ६ ॥
येर्हवीं माझ्या चित्तीं जें होतें ।
तें मी विचारूनि बोलिलों एथें ।
परी निकें काय यापरौतें ।
तें तुम्हीं जाणा ॥ ५२ ॥
पैं वीरु जयांसी ऐकिजे ।
आणि या बोलींचि प्राणु सांडिजे ।
ते एथ संग्रामव्याजें ।
उभे आहाती ॥ ५३ ॥
आतां ऐसियांतें वधावें ।
कीं अव्हेरूनियां निघावें ।
या दोहींमाजीं बरवें ।
तें नेणों आम्ही ॥ ५४ ॥
कार्पण्यदोषोपहतस्वभावः
पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः ।
यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे
शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम् ॥ ७ ॥
आम्हां काय उचित ।
तें पाहतां न स्फुरे एथ ।
जें मोहें येणें चित्त ।
व्याकुळ माझें ॥ ५५ ॥
तिमिरावरुद्ध जैसें ।
दृष्टीचें तेज भ्रंशे ।
मग पासींच असतां न दिसे ।
वस्तुजात ॥ ५६ ॥
देवा तैसें मज जाहलें ।
जें मन हें भ्रांती ग्रासिलें ।
आतां काय हित आपुलें ।
तेंही नेणें ॥ ५७ ॥
तरी श्रीकृष्णा तुवां जाणावें ।
निकें तें आम्हां सांगावें ।
जे सखा सर्वस्व आघवें ।
आम्हांसि तूं ॥ ५८ ॥
तूं गुरु बंधु पिता ।
तूं आमुची इष्ट देवता ।
तूंचि सदा रक्षिता ।
आपदीं आमुतें ॥ ५९ ॥
जैसा शिष्यांतें गुरु ।
सर्वथा नेणें अव्हेरु ।
कीं सरितांतें सागरु ।
त्यजीं केवी ॥ ६० ॥
नातरी अपत्यांतें माये ।
सांडूनि जरी जाये ।
तरी तें कैसेंनि जिये ।
ऐकें कृष्णा ॥ ६१ ॥
तैसा सर्वांपरी आम्हांसी ।
देवा तूंचि एक आहासी ।
आणि बोलिलें जरी न मानिसी ।
मागील माझें ॥ ६२ ॥
तरी उचित काय आम्हां ।
जें व्यभिचरेना धर्मा ।
तें झडकरी पुरुषोत्तमा ।
सांगें आतां ॥ ६३ ॥
न हि प्रपश्यामि
ममापनुद्याद्यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् ।
अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं
सुराणामपि चाधिपत्यम् ॥ ८ ॥
हें सकळ कुळ देखोनि ।
जो शोकु उपनलासे मनीं ।
तो तुझिया वाक्यावांचुनी ।
न जाय आणिकें ॥ ६४ ॥
एथ पृथ्वीतळ आपु होईल ।
हें महेंद्रपदही पाविजेल ।
परी मोह हा न फिटेल ।
मानसींचा ॥ ६५ ॥
जैसीं बीजें सर्वथा आहाळलीं ।
तीं सुक्षेत्रीं जर्ही पेरिलीं ।
तरी न विरूढती सिंचिलीं ।
आवडे तैसीं ॥ ६६ ॥
ना तरी आयुष्य पुरलें आहे ।
तरी औषधें कांहीं नोहे ।
एथ एकचि उपेगा जाये ।
परमामृत ॥ ६७ ॥
तैसे राज्यभोगसमृद्धि ।
उज्जीवन नोहे जीव बुद्धि ।
एथ जिव्हाळा कृपानिधि ।
कारुण्य तुझें ॥ ६८ ॥
ऐसें अर्जुन तेथ बोलिला ।
जंव क्षण एक भ्रांति सांडिला ।
मग पुनरपि व्यापिला ।
उर्मी तेणें ॥ ६९ ॥
कीं मज पाहतां उर्मी नोहे ।
हें अनारिसें गमत आहे ।
तो ग्रासिला महामोहें ।
काळसर्पें ॥ ७० ॥
सवर्म हृदयकल्हारीं ।
तेथ कारुण्यवेळेच्या भरीं ।
लागला म्हणोनि लहरी ।
भांजेचिना ? ॥ ७१ ॥
हें जाणोनि ऐसी प्रौढी ।
जो दृष्टीसवेंचि विष फेडी ।
तो धांवया श्रीहरी गारुडी ।
पातला कीं ॥ ७२ ॥
तैसिया पंडुकुमरा व्याकुळा ।
मिरवतसे श्रीकृष्ण जवळा ।
तो कृपावशें अवलीळा ।
रक्षील आतां ॥ ७३ ॥
म्हणोनि तो पार्थु ।
मोहफणिग्रस्तु ।
म्यां म्हणितला हा हेतु ।
जाणोनियां ॥ ७४ ॥
मग देखा तेथ फाल्गुनु ।
घेतला असे भ्रांती कवळूनु ।
जैसा घनपटळीं भानु ।
आच्छादिजे ॥ ७५ ॥
तयापरी तो धनुर्धरु ।
जाहलासे दुःखें जर्जरु ।
जैसा ग्रीष्मकाळीं गिरिवरु ।
वणवला कां ॥ ७६ ॥
म्हणोनि सहजें सुनीळु ।
कृपामृतें सजळु ।
तो वोळलासे श्रीगोपाळु ।
महामेघु ॥ ७७ ॥
तेथ सुदर्शनांची द्युति ।
तेचि विद्युल्लता झळकती ।
गंभीर वाचा ते आयती ।
गर्जनेची ॥ ७८ ॥
आतां तो उदार कैसा वर्षेल ।
तेणें अर्जुनाचळु निवेल ।
मग नवी विरूढी फुटेल ।
उन्मेषाची ॥ ७९ ॥
ते कथा आइका ।
मनाचिया आराणुका ।
ज्ञानदेवो म्हणे देखा ।
निवृत्तिदासु ॥ ८० ॥
संजय उवाच ।
एवमुक्त्वा हृषीकेशं
गुडाकेशः परंतप ।
न योत्स्य इति गोविंदं
उक्त्वा तूष्णीं बभूव ह ॥ ९ ॥
ऐसें संजयो असे सांगतु ।
म्हणे राया तो पार्थु ।
पुनरपि शोकाकुळितु ।
काय बोले ॥ ८१ ॥
आइके सखेदु बोले श्रीकृष्णातें ।
आतां नाळवावें तुम्हीं मातें ।
मी सर्वथा न झुंजें एथें ।
भरंवसेनी ॥ ८२ ॥
ऐसें येकि हेळां बोलिला ।
मग मौन धरूनि ठेला ।
तेथ श्रीकृष्णा विस्मो पातला ।
देखोनि तयातें ॥ ८३ ॥
तमुवाच हृषीकेशः
प्रहसन्निव भारत ।
सेनयोरूभयोर्मध्ये
विषीदन्तमिदं वचः ॥ १० ॥
मग आपुलां चित्तीं म्हणे ।
एथ हें कायी आदरिलें येणें ।
अर्जुन सर्वथा कांहीं नेणें ।
काय कीजे ॥ ८४ ॥
हा उमजे आतां कवणेपरी ।
कैसेनि धीरू स्वीकारी ।
जैसा ग्रहातें पंचाक्षरी ।
अनुमानी कां ॥ ८५ ॥
ना तरी असाध्य देखोनि व्याधि ।
अमृतासम दिव्य औषधि ।
वैद्य सूचि निरवधि ।
निदानीची ॥ ८६ ॥
तैसे विवरीतु असे श्रीअनंतु ।
तया दोन्ही सैन्याआंतु ।
जयापरी पार्थु ।
भ्रांती सांडी ॥ ८७ ॥
तें कारण मनीं धरिलें ।
मग सरोष बोलों आदरिलें ।
जैसे मातेच्या कोपीं थोकुलें ।
स्नेह आथी ॥ ८८ ॥
कीं औषधाचिया कडुवटपणीं ।
जैसी अमृताची पुरवणीं ।
ते आहाच न दिसे परी गुणीं ।
प्रकट होय ॥ ८९ ॥
तैसीं वरिवरी पाहतां उदासें ।
आंत तरी अतिसुरसें ।
तियें वाक्यें हृषीकेशें ।
बोलों आदरिलीं ॥ ९० ॥
श्रीभगवानुवाच ।
अशोच्यानन्वशोचस्त्वं
प्रज्ञावादांश्च भाषसे ।
गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः ॥ ११ ॥
मग अर्जुनातें म्हणितलें ।
आम्हीं आजि हें नवल देखिलें ।
जें तुवां एथ आदरिलें ।
माझारींचि ॥ ९१ ॥
तूं जाणता तरी म्हणविसी ।
परी नेणिवेतें न संडिसी ।
आणि शिकवूं म्हणों तरी बोलसी ।
बहुसाल नीति ॥ ९२ ॥
जात्यंधा लागे पिसें ।
मग तें सैरा धांवे जैसें ।
तुझे शहाणपण तैसें ।
दिसतसे ॥ ९३ ॥
तूं आपणपें तरी नेणसी ।
परी या कौरवांतें शोचूं पहासी ।
हा बहु विस्मय आम्हांसी ।
पुढतपुढती ॥ ९४ ॥
तरी सांग पां अर्जुना ।
तुजपासूनि स्थिति या त्रिभुवना ? ।
हे अनादि विश्वरचना ।
तें लटके कायी ? ॥ ९५ ॥
एथ समर्थु एक आथी ।
तयापासूनि भूतें होती ।
तरी हें वायांचि काय बोलती ।
जगामाजीं ? ॥ ९६ ॥
हो कां सांप्रत ऐसें जाहलें ।
जे हे जन्ममृत्यु तुवां सृजिलें ।
आणि नाशु पावे नाशिलें ।
तुझेनि कायी ॥ ९७ ॥
तूं भ्रमलेपणें अहंकृती ।
यांसि घातु न धरिसी चित्तीं ।
तरी सांगें कायि हे होती ।
चिरंतन ॥ ९८ ॥
कीं तूं एक वधिता ।
आणि सकळ लोकु हा मरता ।
ऐसी भ्रांति झणें चित्ता ।
येवों देसी ॥ ९९ ॥
अनादिसिद्ध हें आघवें ।
होत जात स्वभावें ।
तरी तुवां कां शोचावें ।
सांगें मज ॥ १०० ॥
परी मूर्खपणें नेणसी ।
न चिंतावें तें चिंतीसी ।
आणि तूंचि नीति सांगसी ।
आम्हांप्रति ॥ १०१ ॥
देखैं विवेकी जे होती ।
ते दोहीतेंहीं न शोचिती ।
जे होय जाय हे भ्रांती ।
म्हणौनियां ॥ १०२ ॥
न त्वेवाहं जातु नासं न
त्वं नेमे जनाधिपाः ।
न चैव न भविष्यामः
सर्वे वयमतः परम् ॥ १२ ॥
अर्जुना सांगेन आइक ।
एथ आम्ही तुम्ही देख ।
आणि हे भूपति अशेख ।
आदिकरुनी ॥ १०३ ॥
नित्यता ऐसेचि असोनी ।
ना तरी निश्चित क्षया जाउनी ।
हे भ्रांति वेगळी करुनी ।
दोन्ही नाहीं ॥ १०४ ॥
हे उपजे आणि नाशे ।
तें मायावशें दिसे ।
एर्हवीं तत्त्वता वस्तु जें असे ।
तें अविनाशचि ॥ १०५ ॥
जैसें पवनें तोय हालविलें ।
आणि तरंगाकार जाहलें ।
तरी कवण कें जन्मलें ।
म्हणों ये तेथ ? ॥ १०६ ॥
तेंचि वायूचें स्फुरण ठेलें ।
आणि उदक सहज सपाट जाहलें ।
तरी आतां काय निमालें ।
विचारीं पां ॥ १०७ ॥
देहिनोऽस्मिन्यथा देहे
कौमारं यौवनं जरा ।
तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र
न मुह्यति ॥ १३ ॥
आइकें शरीर तरी एक ।
परी वयसा भेद अनेक ।
हें प्रत्यक्षचि देख ।
प्रमाण तूं ॥ १०८ ॥
एथ कौमारत्व दिसे ।
मग तारुण्यीं तें भ्रंशे ।
परी देहचि हा न नाशे ।
एकेकासवें ॥ १०९ ॥
तैसीं चैतन्याच्या ठायीं ।
इयें शरीरांतरें होती जाती पाहीं ।
ऐसें जाणे तया नाहीं ।
व्यामोहदुःख ॥ ११० ॥
मात्रास्पर्शास्तु कौन्तेय
शीतोष्णसुखदुःखदा ।
आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत ॥ १४ ॥
एथ कौमारत्व दिसे ।
मग तारुण्यीं तें भ्रंशे ।
परी देहचि हा न नाशे ।
एकेकासवें ॥ १०९ ॥
तैसीं चैतन्याच्या ठायीं ।
इयें शरीरांतरें होती जाती पाहीं ।
ऐसें जाणे तया नाहीं ।
व्यामोहदुःख ॥ ११० ॥
एथ नेणावया हेंचि कारण ।
जें इंद्रियां आधीनपण ।
तिहीं आकळिजे अंतःकरण ।
म्हणऊनि भ्रमे ॥ १११ ॥
इंद्रियें विषय सेविती ।
तेथ हर्ष शोक उपजती ।
ते अंतर आप्लविती ।
संगें येणें ॥ ११२ ॥
जयां विषयांच्या ठायीं ।
एकनिष्ठता कहीं नाहीं ।
तेथ दुःख आणि कांहीं ।
सुखही दिसे ॥ ११३ ॥
देखें शब्दाचि व्याप्ति ।
निंदा आणि स्तुति ।
तेथ द्वेषाद्वेष उपजती ।
श्रवणद्वारें ॥ ११४ ॥
मृदु आणि कठीण ।
हे स्पर्शाचे दोन्ही गुण ।
जे वपूचेनि संगें कारण ।
संतोषखेदां ॥ ११५ ॥
भ्यासुर आणि सुरेख ।
हें रूपाचें स्वरूप देख ।
जें उपजवी सुखदुःख ।
नेत्रद्वारें ॥ ११६ ॥
सुगंधु आणि दुर्गंधु ।
हा परिमळाचा भेदु ।
जो घ्राणसंगें विषादु ।
तोषु देता ॥ ११७ ॥
तैसाचि द्विविध रसु ।
उपजवी प्रीति त्रासु ।
म्हणौनि हा अपभ्रंशु ।
विषयसंगु ॥ ११८ ॥
देखें इंद्रियां आधीन होईजे ।
तैं शीतोष्णांतें पाविजे ।
आणि सुखदुःखीं आकळिजे ।
आपणपें ॥ ११९ ॥
या विषयांवांचूनि कांहीं ।
आणीक सर्वथा रम्य नाहीं ।
ऐसा स्वभावोचि पाहीं ।
इंद्रियांचा ॥ १२० ॥
हे विषय तरी कैसे ।
रोहिणीचें जळ जैसें ।
कां स्वप्नींचा आभासे ।
भद्रजाति ॥ १२१ ॥
देखैं अनित्य तियापरी ।
म्हणौनि तूं अव्हेरीं ।
हा सर्वथा संगु न धरीं ।
धनुर्धरा ॥ १२२ ॥
यं हि न व्यथयन्त्येते
पुरुषं पुरुषर्षभ ।
समदुःखसुखं धीरं
सोऽमृतत्वाय कल्पते ॥ १५ ॥
हे विषय जयातें नाकळिती ।
तया सुखदुःखें दोनी न पवती ।
आणि गर्भवासुसंगती ।
नाहीं तया ॥ १२३ ॥
तो नित्यरूप पार्था ।
वोळखावा सर्वथा ।
जो या इंद्रियार्था ।
नागवेचि ॥ १२४ ॥
नासतो विद्यते भावो
नाभावो विद्यते सतः ।
उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः ॥ १६ ॥
आतां अर्जुना कांहीं एक ।
सांगेन मी आईक ।
जे विचारपर लोक ।
वोळखिती ॥ १२५ ॥
या उपाधिमाजीं गुप्त ।
चैतन्य असे सर्वगत ।
तें तत्त्वज्ञ संत ।
स्वीकारिती ॥ १२६ ॥
सलिलीं पय जैसें ।
एक होऊनि मीनलें असे ।
परी निवडूनि राजहंसें ।
वेगळें कीजे ॥ १२७ ॥
कीं अग्निमुखें किडाळ ।
तोडोनियां चोखाळ ।
निवडिती केवळ ।
बुद्धिमंत ॥ १२८ ॥
ना तरी जाणिवेच्या आयणी ।
करितां दधिकडसणी ।
मग नवनीत निर्वाणीं ।
दिसे जैसें ॥ १२९ ॥
कीं भूस बीज एकवट ।
उपणितां राहे घनवट ।
तेथ उडे तें फलकट ।
जाणों आलें ॥ १३० ॥
तैसें विचारितां निरसलें ।
तें प्रपंचु सहजें सांडवलें ।
मग तत्त्वता तत्त्व उरलें ।
ज्ञानियांसि ॥ १३१ ॥
म्हणौनि अनित्याच्या ठायीं ।
तयां आस्तिक्यबुद्धि नाहीं ।
निष्कर्षु दोहींही ।
देखिला असे ॥ १३२ ॥
अविनाशि तु तद्विद्धि
येन सर्वमिदं ततम् ।
विनाशमव्ययस्यास्य न
कश्चित्कर्तुमर्हति ॥ १७ ॥
देखें सारासार विचारितां ।
भ्रांति ते पाहीं असारता ।
तरी सार तें स्वभावता ।
नित्य जाणें ॥ १३३ ॥
हा लोकत्रयाकारु ।
तो जयाचा विस्तारु ।
तेथ नाम वर्ण आकारु ।
चिन्ह नाहीं ॥ १३४ ॥
जो सर्वदा सर्वगतु ।
जन्मक्षयातीतु ।
तया केलियाहि घातु ।
कदा नोहे ॥ १३५ ॥
अन्तवन्त इमे देहा
नित्यस्योक्ताः शरीरिणः ।
अनाशिनोऽप्रमेयस्य
तस्माद्युध्यस्व भारत ॥ १८ ॥
आणि शरीरजात आघवें ।
हें नाशिवंत स्वभावें ।
म्हणौनि तुवां झुंजावें ।
पंडुकुमरा ॥ १३६ ॥
य एनं वेत्ति हन्तारं
यश्चैनं मन्यते हतम् ।
उभौ तौ न विजानीतो नायं
हन्ति न हन्यते ॥ १९ ॥
तूं धरूनि देहाभिमानातें ।
दिठी सूनि शरीरातें ।
मी मारिता हे मरते ।
म्हणतु आहासी ॥ १३७ ॥
तरी अर्जुना तूं हें नेणसी ।
जरी तत्त्वता विचारिसी ।
तरी वधिता तूं नव्हेसी ।
हे वध्य नव्हती ॥ १३८ ॥
न जायते म्रियते वा कदाचिद् न
अयं भूत्वा भविता वा न भूयः ।
अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न
हन्यते हन्यमाने शरीरे ॥ २० ॥
वेदाविनाशिनं नित्यं
य एनमजमव्ययम् ।
कथं स पुरुषः पार्थ कं
घातयति हन्ति कम् ॥ २१ ॥
जैसें स्वप्नामाजीं देखिजे ।
तें स्वप्नींचि साच आपजे ।
मग चेऊनियां पाहिजे ।
तंव कांहीं नाहीं ॥ १३९ ॥
तैसी हे जाण माया ।
तूं भ्रमतु आहासी वायां ।
शस्त्रें हाणितलिया छाया ।
जैसी आंगीं न रुपे ॥ १४० ॥
कां पूर्ण कुंभ उलंडला ।
तेथ बिंबाकारु दिसे भ्रंशला ।
परी भानु नाहीं नासला ।
तयासवें ॥ १४१ ॥
ना तरी मठीं आकाश जैसें ।
मठाकृती अवतरलें असे ।
तो भंगलिया आपैसें ।
स्वरूपचि ॥ १४२ ॥
तैसें शरीराच्या लोपीं ।
सर्वथा नाशु नाहीं स्वरूपीं ।
म्हणौनि तू हें नारोपी ।
भ्रांति बापा ॥ १४३ ॥
वासांसि जीर्णानि यथा विहाय
नवानि गृह्णाति नरोऽपराणि ।
तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि
संयाति नवानि देही ॥ २२ ॥
जैसें जीर्ण वस्त्र सांडिजे ।
मग नूतन वेढिजे ।
तैसें देहांतरातें स्वीकारिजे ।
चैतन्यनाथें ॥ १४४ ॥
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि
नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न
शोषयति मारुतः ॥ २३ ॥
अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च ।
नित्यः सर्वगतः
स्थाणुरचलोऽयं सनातनः ॥ २४ ॥
हा अनादि नित्यसिद्धु ।
निरुपाधि विशुद्धु ।
म्हणौनि शस्त्रादिकीं छेदु ।
न घडे यया ॥ १४५ ॥
हा प्रळयोदकें नाप्लवे ।
अग्निदाहो न संभवे ।
एथ महाशोषु न प्रभवे ।
मारुताचा ॥ १४६ ॥
अर्जुना हा नित्यु ।
अचळु हा शाश्वतु ।
सर्वत्र सदोदितु ।
परिपूर्णु हा ॥१४७ ॥
अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते ।
तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि ॥ २५ ॥
हा तर्काचिये दिठी ।
गोचर नोहे किरीटी ।
ध्यान याचिये भेटी ।
उत्कंठा वाहे ॥ १४८ ॥
हा सदा दुर्लभु मना ।
आपु नोहे साधना ।
निःसीमु हा अर्जुना ।
पुरुषोत्तमु ॥ १४९ ॥
हा गुणत्रयरहितु ।
अनादि अविकृतु ।
व्यक्तीसी अतीतु ।
सर्वरूप ॥ १५० ॥
अर्जुना ऐसा हा जाणावा ।
सकळात्मकु देखावा ।
मग सहजें शोकु आघवा ।
हरेल तुझा ॥ १५१ ॥
अथ चैनं नित्यजातं
नित्यं वा मन्यसे मृतम् ।
तथापि त्वं महाबाहो नैवं
शौचितुमर्हसि ॥ २६ ॥
अथवा ऐसा नेणसी ।
तूं अंतवंतचि मानिसी ।
तर्ही शोचूं न पवसी ।
पंडुकुमरा ॥ १५२ ॥
जो आदि स्थिति अंतु ।
हा निरंतर असे नित्यु ।
जैसा प्रवाहो अनुस्यूतु ।
गंगाजळाचा ॥ १५३ ॥
तें आदि नाहीं खंडलें ।
समुद्रीं तरी असे मीनलें ।
आणि जातचि मध्यें उरलें ।
दिसे जैसें ॥ १५४ ॥
इयें तिन्ही तयापरी ।
सरसींच सदा अवधारीं ।
भूतांसी कवणीं अवसरीं ।
ठाकती ना ॥ १५५ ॥
म्हणौनि हें आघवें ।
एथ तुज नलगे शोचावें ।
जे स्थितीचि हे स्वभावें ।
अनादि ऐसी ॥ १५६ ॥
ना तरी हें अर्जुना ।
नयेचि तुझिया मना ।
जे देखोनि लोकु अधीना ।
जन्मक्षया ॥ १५७ ॥
तरी एथ कांहीं ।
तुज शोकासि कारण नाहीं ।
हे जन्ममृत्यु पाहीं ।
अपरिहर ॥ १५८ ॥
जातस्य हि ध्रुवो
मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च ।
तस्मादपरिहार्येऽर्थे न
त्वं शोचितुमर्हसि ॥ २७ ॥
उपजे तें नाशे ।
नाशलें पुनरपि दिसे ।
हें घटिकायंत्र जैसें ।
परिभ्रमे गा ॥ १५९ ॥
ना तरी उदो अस्तु आपैसें ।
अखंडित होत जात जैसें ।
हें जन्ममरण तैसें ।
अनिवार जगीं ॥ १६० ॥
महाप्रळयावसरें ।
हें त्रैलोक्यहि संहरे ।
म्हणौनि हा न परिहरे ।
आदि अंतु ॥ १६१ ॥
तूं जरी हें ऐसें मानिसी ।
तरी खेदु कां करिसी ? ।
काय जाणतुचि नेणसी ।
धनुर्धरा ॥ १६२ ॥
एथ आणीकही एक पार्था ।
तुज बहुतीं परी पहातां ।
दुःख करावया सर्वथा ।
विषो नाहीं ॥ १६३ ॥
अव्यक्तादीनि भूतानि
व्यक्तमध्यानि भारत ।
अव्यक्तनिधनान्येव
तत्र का परिदेवना ॥ २८ ॥
जियें समस्तें इयें भूतें ।
जन्माआदि अमूर्तें ।
मग पातली व्यक्तीतें ।
जन्मलेया ॥ १६४ ॥
तियें क्षयासि जेथ जाती ।
तेथ निभ्रांत आनें नव्हती ।
देखें पूर्वस्थितीच येती ।
आपुलिये ॥ १६५ ॥
येर मध्यें जें प्रतिभासे ।
तें निद्रिता स्वप्न जैसें ।
तैसा आकारु हा मायवशें ।
तत्स्वरूपीं ॥ १६६ ॥
ना तरी पवनें स्पर्शिलें नीर ।
पढियासे तरंगाकार ।
कां परापेक्षां अळंकार ।
व्यक्ती कनकीं ॥ १६७ ॥
तैसे सकळ हें मूर्त ।
जाण पां मायाकारित ।
जैसें आकाशीं बिंबत ।
अभ्रपटल ॥ १६८ ॥
तैसें आदीचि जें नाहीं ।
तयालागीं तूं रुदसी कायी ।
तूं अवीट तें पाहीं ।
चैतन्य एक ॥ १६९ ॥
जयाचि आर्तीचि भोगित ।
विषयीं त्यजिले संत ।
जयालागीं विरक्त ।
वनवासिये ॥ १७० ॥
दिठी सूनि जयातें ।
ब्रह्मचर्यादि व्रतें ।
मुनीश्वर तपातें ।
आचरताती ॥ १७१ ॥
आश्चर्यवत्पश्यति कश्चिदेनमाश्चर्यवद्वदति तथैव चान्यः ।
आश्चर्यवच्चैनमन्यः श्रुणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् ॥ २९ ॥
एक अंतरीं निश्चळ ।
जें निहाळितां केवळ ।
विसरले सकळ ।
संसारजात ॥ १७२ ॥
एकां गुणानुवादु करितां ।
उपरति होऊन चित्ता ।
निरवधि तल्लीनता ।
निरंतर ॥ १७३ ॥
एक ऐकतांचि निवाले ।
ते देहभावी सांडिले ।
एक अनुभवें पातले ।
तद्रूपता ॥ १७४ ॥
जैसे सरिता ओघ समस्त ।
समुद्रामाजीं मिळत ।
परी माघौते न समात ।
परतले नाहीं ॥ १७५ ॥
तैसिया योगीश्वरांचिया मती ।
मिळवणीसवें एकवटती ।
परी जे विचारूनि पुनरावृत्ति ।
भजतीचिना ॥ १७६ ॥
देही नित्यमवध्योऽयं
देहे सर्वस्य भारत ।
तस्मात्सर्वाणि भूतानि न
त्वं शोचितुमर्हसि ॥ ३० ॥
जें सर्वत्र सर्वही देहीं ।
जया करितांही घातु नाहीं ।
तें विश्वात्मक तूं पाहीं ।
चैतन्य एक ॥ १७७ ॥
जयाचेनि स्वभावें ।
हें होत जात आघवें ।
तरी सांग काय शोचावें ।
एथ तुवां ॥ १७८ ॥
एर्हवीं तरी पार्था ।
तुज कां नेणों न मनें चित्ता ।
परी किडाळ हें शोचितां ।
बहुतीं परीं ॥ १७९ ॥
स्वधर्ममपि चावेक्ष्य न
विकम्पितुमर्हसि ।
धर्माद्धि युद्धाच्छेयोऽन्यत्क्षत्रियस्य
न विद्यते ॥ ३१ ॥
तूं अझुनी कां न विचारिसी ।
काय हें चिंतितु आहासी ।
स्वधर्मु तो विसरलासी ।
तरावें जेणें ॥ १८० ॥
या कौरवां भलतें जाहलें ।
अथवा तुजचि कांहीं पातलें ।
कीं युगचि हें बुडालें ।
जर्ही एथ ॥ १८१ ॥
तरी स्वधर्मु एकु आहे ।
तो सर्वथा त्याज्य नोहे ।
मग तरिजेल काय पाहें ।
कृपाळूपणें ॥ १८२ ॥
अर्जुना तुझें चित्त ।
जर्ही जाहलें द्रवीभूत ।
तर्ही हें अनुचित ।
संग्रामसमयीं ॥ १८३ ॥
अगा गोक्षीर जरी जाहलें ।
तरी पथ्यासि नाहीं म्हणितलें ।
ऐसेनिहि विष होय सुदलें ।
नवज्वरीं देतां ॥ १८४ ॥
तैसें आनी आन करितां ।
नाशु होईल हिता ।
म्हणौनि तूं आतां ।
सावध होई ॥ १८५ ॥
वायांचि व्याकुळ कायी ।
आपुला निजधर्मु पाहीं ।
जो आचरितां बाधु नाहीं ।
कवणें काळीं ॥ १८६ ॥
जैसें मार्गेंचि चालतां ।
अपावो न पवे सर्वथा ।
कां दीपाधारें वर्ततां ।
नाडळिजे ॥ १८७ ॥
तयापरी पार्था ।
स्वधर्में राहाटतां ।
सकळ कामपूर्णता ।
सहजें होय ॥ १८८ ॥
म्हणौनि यालागीं पाहीं ।
तुम्हां क्षत्रियां आणीक कांहीं ।
संग्रामावांचूनि नाहीं ।
उचित जाणें ॥ १८९ ॥
निष्कपटा होआवें ।
उसिणा घाई झुंजावें ।
हें असो काय सांगावें ।
प्रत्यक्षावरी ॥ १९० ॥
यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतम् ।
सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम् ॥ ३२ ॥
अर्जुना झुंज देखें आतांचें ।
हें हो कां जें दैव तुमचें ।
कीं निधान सकळ धर्माचें ।
प्रगटलें असे ॥ १९१ ॥
हा संग्रामु काय म्हणिपे ।
कीं स्वर्गुचि येणें रूपें ।
मूर्त कां प्रतापें ।
उदो केला ॥ १९२ ॥
ना तरी गुणाचेनि पतिकरें ।
आर्तीचेनि पडिभरें ।
हें कीर्तीचि स्वयंवरें ।
आली तुज ॥ १९३ ॥
क्षत्रियें बहुत पुण्य कीजे ।
तैं झुंज ऐसें लाहिजे ।
जैसें मार्गें जातां आडळिजे ।
चिंतामणि ॥ १९४ ॥
ना तरी जांभया पसरे मुख ।
तेथ अवचटें पडे पीयूख ।
तैसा संग्रामु हा देख ।
पातला असे ॥ १९५ ॥
अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ।
ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि ॥ ३३ ॥
आतां हा ऐसा अव्हेरिजे ।
मग नाथिलें शोचूं बैसिजे ।
तरी आपण आहाणा होईजे ।
आपणपेयां ॥ १९६ ॥
पूर्वजांचें जोडलें ।
आपणचि होय धाडिलें ।
जरी आजि शस्त्र सांडिलें ।
रणीं इये ॥ १९७ ॥
असती कीर्ति जाईल ।
जगचि अभिशापु देईल ।
आणि गिंवसित पावतील ।
महादोष ॥ १९८ ॥
जैसीं भातारेंहीन वनिता ।
उपहती पावे सर्वथा ।
तैशी दशा जीविता ।
स्वधर्मेंवीण ॥ १९९ ॥
ना तरी रणीं शव सांडिजे ।
तें चौमेरी गिधीं विदारिजे ।
तैसें स्वधर्महीना अभिभविजे ।
महादोषीं ॥ २०० ॥
अकीर्तिं चापि भूतानि
कथयिष्यन्ति तेऽव्ययाम् ।
संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते ॥ ३४ ॥
म्हणौनि स्वधर्मु हा सांडसील ।
पापा वरपडा होसील ।
आणि अपेश तें न वचेल ।
कल्पांतवरी ॥ २०१ ॥
जाणतेनि तंवचि जियावें ।
जंव अपकीर्ति आंगा न पवे ।
आणि सांग पां केवीं निगावें ।
एथोनियां ? ॥ २०२ ॥
तू निर्मत्सर सदयता ।
येथूनि निघसील कीर माघौता ।
परी ते गती समस्तां ।
न मनेल ययां ॥ २०३ ॥
हे चहूंकडूनि वेढितील ।
बाणवरी घेतील ।
तेथ पार्था न सुटिजेल ।
कृपाळुपणें ॥ २०४ ॥
ऐसेनिहि प्राणसंकटें ।
जरी विपायें पां निघणें घटे ।
तरी तें जियालेंही वोखटें ।
मरणाहुनी ॥ २०५ ॥
भयाद्रणादुपरतं
मंस्यन्ते त्वां महारथाः ।
येषां च त्वं बहुमतो भूत्वा
यास्यसि लाघवम् ॥ ३५ ॥
तूं आणिकही एक न विचारिसी ।
एथ संभ्रमें झुंजों आलासी ।
आणि सकणवपणें निघालासी ।
मागुता जरी ॥ २०६ ॥
तरी तुझें तें अर्जुना ।
या वैरियां दुर्जनां ।
कां प्रत्यया येईल मना ।
सांगैं मज ॥ २०७ ॥
अवाच्यवादांश्च बहून्वदिष्यन्ति तवाहिताः ।
निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो
दुःखतरं नु किम् ॥ ३६ ॥
हे म्हणती गेला रे गेला ।
अर्जुन आम्हां बिहाला ।
हा सांगैं बोलु उरला ।
निका कायी ? ॥ २०८ ॥
लोक सायासें करूनि बहुतें ।
कां वेंचिती आपुलीं जीवितें ।
परी वाढविती कीर्तीतें ।
धनुर्धरा ॥ २०९ ॥
ते तुज अनायासें ।
अनकळित जोडिली असे ।
हें अद्वितीय जैसें ।
गगन आहे ॥ २१० ॥
तैसी कीर्ती निःसीम ।
तुझ्या ठायीं निरुपम ।
तुझे गुण उत्तम ।
तिहीं लोकीं ॥ २११ ॥
दिगंतीचे भूपति ।
भाट होऊनि वाखाणिती ।
जे ऐकिलिया दचकती ।
कृतांतादिक ॥ २१२ ॥
ऐसी महिमा घनवट ।
गंगा जैसी चोखट ।
जया देखीं जगीं सुभट ।
वाट जाहली ॥ २१३ ॥
तें पौरुष तुझें अद्भुत ।
आइकोनियां हे समस्त ।
जाहले आथि विरक्त ।
जीवितेंसी ॥ २१४ ॥
जैसा सिंहाचिया हाकां ।
युगांतु होय मदमुखा ।
तैसा कौरवां अशेखां ।
धाकु तुझा ॥ २१५ ॥
जैसे पर्वत वज्रातें ।
ना तरी सर्प गरुडातें ।
तैसे अर्जुना हे तूतें ।
मानिती सदा ॥ २१६ ॥
तें अगाधपण जाईल ।
मग हीणावो अंगा येईल ।
जरी मागुता निघसील ।
न झुंजतुचि ॥ २१७ ॥
आणि हे पळतां पळों नेदिती ।
धरूनिं अवकळा करिती ।
न गणित कुटी बोलती ।
आइकतां तुज ॥ २१८ ॥
मग ते वेळीं हियें फुटावें ।
आतां लाठेपणें कां न झुजावें ? ।
हे जिंतलें तरी भोगावें ।
महीतळ ॥ २१९ ॥
हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं
जित्वा वा भोक्ष्यसे महीम् ।
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय
युद्धाय कृतनिश्चयः ॥ ३७ ॥
ना तरी रणीं एथ ।
झुंजतां वेंचलें जीवित ।
तरी स्वर्गसुख अनकळित ।
पावसील ॥ २२०॥
म्हणौनि ये गोठी ।
विचारु न करी किरीटी ।
आतां धनुष्य घेऊनि उठीं ।
झुंजैं वेगीं ॥ २१॥
ना तरी रणीं एथ ।
झुंजतां वेंचलें जीवित ।
तरी स्वर्गसुख अनकळित ।
पावसील ॥ २२० ॥
म्हणौनि ये गोठी ।
विचारु न करी किरीटी ।
आतां धनुष्य घेऊनि उठीं ।
झुंजैं वेगीं ॥ २२१ ॥
देखैं स्वधर्मु हा आचरतां ।
दोषु नाशे असता ।
तुज भ्रांति हे कवण चित्ता ।
पातकाची ॥ २२२ ॥
सांगैं प्लवेंचि काय बुडिजे ।
कां मार्गीं जातां आडळिजे ।
परी विपायें चालों नेणिजे ।
तरी तेंही घडे ॥ २२३ ॥
अमृतें तरीच मरिजे ।
जरी विखेंसि सेविजे ।
तैसा स्वधर्मीं दोषु पाविजे ।
हेतुकपणें ॥ २२४ ॥
म्हणौनियां पार्था ।
हेतू सांडोनि सर्वथा ।
तुज क्षात्रवृत्ति झुंजतां ।
पाप नाहीं ॥ २२५ ॥
सुखदुःखे समे कृत्वा
लाभालाभौ जयाजयौ ।
ततो युद्धाय युज्यस्व
नैवं पापमवाप्स्यसि ॥ ३८ ॥
सुखीं संतोषां न यावें ।
दुःखीं विषादा न भजावें ।
आणि लाभालाभ न धरावे ।
मनामाजीं ॥ २२६ ॥
एथ विजयपण होईल ।
कीं सर्वथा देह जाईल ।
हें आधींचि कांही पुढील ।
चिंतावेना ॥ २२७ ॥
आपणयां उचिता ।
स्वधर्में राहाटतां ।
जें पावे तें निवांता ।
साहोनि जावें ॥ २२८ ॥
ऐसियां मनें होआवें ।
तरी दोषु न घडे स्वभावें ।
म्हणौनि आतां झुंजावें ।
निभ्रांत तुवां ॥ २२९ ॥
एषा तेऽभिहिता सांख्ये
बुद्धिर्योगे त्विमां श्रृणु ।
बुद्ध्या युक्तो यया पार्थ
कर्मबन्धं प्रहास्यसि ॥ ३९ ॥
हे सांख्यस्थिति मुकुळित ।
सांगितली तुज येथ ।
आतां बुद्धियोगु निश्चित ।
अवधारीं पां ॥ २३० ॥
जया बुद्धियुक्ता ।
जाहलिया पार्था।
कर्मबंधु सर्वथा ।
बाधूं न पवे ॥ २३१ ॥
जैसें वज्रकवच लेइजे ।
मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे ।
परी जैतेसीं उरिजे ।
अचुंबित ॥ २३२ ॥
नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते ।
स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् ॥ ४० ॥
तैसें ऐहिक तरी न नशे ।
आणि मोक्षु तो उरला असे ।
जेथ पूर्वानुक्रमु दिसे ।
चोखाळत ॥ २३३ ॥
कर्माधारें राहाटिजे ।
परी कर्मफळ न निरीक्षिजे ।
जैसा मंत्रज्ञु न बंधिजे ।
भूतबाधा ॥ २३४ ॥
तियापरी जे सुबुद्धि ।
आपुलालिया निरवधि ।
हा असतांचि उपाधि ।
आकळूं न सके ॥ २३५ ॥
जेथ न संचरे पुण्यपाप ।
जें सूक्ष्म अति निष्कंप ।
गुणत्रयादि लेप ।
न लगती जेथ ॥ २३६ ॥
अर्जुना तें पुण्यवशें ।
जरी अल्पचि हृदयीं बुद्धि प्रकाशे ।
तरी अशेषही नाशे ।
संसारभय ॥ २३७ ॥
व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनन्दन ।
बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयोऽव्यवसायिनाम् ॥ ४१ ॥
जैसी दीपकळिका धाकुटी ।
परी बहु तेजातें प्रकटी ।
तैसी सद्बुद्धी हे थेकुटी ।
म्हणों नये ॥ २३८ ॥
पार्था बहुतीं परी ।
हे अपेक्षिजे विचारशूरीं ।
जे दुर्लभ चराचरीं ।
सद्वासना ॥ २३९ ॥
आणिकासारिखा बहुवसु ।
जैसा न जोडे परिसु ।
कां अमृताचा लेशु ।
दैवगुणें ॥ २४० ॥
तैसी दुर्लभ जे सद्बुद्धि ।
जिये परमात्माचि अवधि ।
जैसा गंगेसी उदधि ।
निरंतर ॥ २४१ ॥
तैसें ईश्वरावाचुंनी कांहीं ।
जिये आणीक लाणी नाहीं ।
ते एकचि बुद्धि पाहीं ।
अर्जुना जगीं ॥ २४२ ॥
येर ते दुर्मति ।
जे बहुधा असे विकरति ।
तेथ निरंतर रमती ।
अविवेकिये ॥ २४३ ॥
म्हणौनि तयां पार्था ।
स्वर्ग संसार नरकावस्था ।
आत्मसुख सर्वथा ।
दृष्ट नाहीं ॥ २४४ ॥
यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः ।
वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः ॥ ४२ ॥
कामात्मानः स्वर्गपरा
जन्मकर्मफलप्रदाम् ।
क्रियाविशेषबहुलां
भोगैश्वर्यगतिं प्रति ॥ ४३ ॥
भोगैश्वर्यप्रसक्तानां
तयापहृतचेतसाम् ।
व्यवसायात्मिका बुद्धिः
समाधौ न विधीयते ॥ ४४ ॥
वेदाधारें बोलती ।
केवळ कर्म प्रतिष्ठिती ।
परी कर्मफळीं आसक्ती ।
धरूनियां ॥ २४५ ॥
म्हणती संसारीं जन्मिजे ।
यज्ञादिक कर्म कीजे ।
मग स्वर्गसुख भोगिजे ।
मनोहर ॥ २४६ ॥
येथ हें वांचूनि कांहीं ।
आणिक सर्वथा सुखचि नाहीं ।
ऐसें अर्जुना बोलती पाहीं ।
दुर्बुद्धि ते ॥ २४७ ॥
देखैं कामना अभिभूत ।
होऊनि कर्में आचरत ।
ते केवळ भोगीं चित्त ।
देऊनियां ॥ २४८ ॥
क्रियाविशेषें बहुतें ।
न लोपिती विधीतें ।
निपुण होऊन धर्मातें ।
अनुष्ठिती ॥ २४९ ॥
परी एकचि कुडें करितीं ।
जे स्वर्गकामु मनीं धरिती ।
यज्ञपुरुषा चुकती ।
भोक्ता जो ॥ २५० ॥
जैसा कर्पूराचा राशी कीजे ।
मग अग्नि लाऊन दीजे ।
कां मिष्टान्नीं संचरविजे ।
काळकूट ॥ २५१ ॥
दैवें अमृतकुंभ जोडला ।
तो पायें हाणोनि उलंडिला ।
तैसा नासिती धर्मु निपजला ।
हेतुकपणें ॥ २५२ ॥
सायासें पुण्य अर्जिजे ।
मग संसारु कां अपेक्षिजे ? ।
परी नेणती ते काय कीजे ।
अप्राप्य देखें ॥ २५३ ॥
जैसी रांधवणी रससोय निकी ।
करूनियां मोलें विकी ।
तैसा भोगासाठीं अविवेकी ।
धाडिती धर्मु ॥ २५४ ॥
म्हणोनि हे पार्था ।
दुर्बुद्धि देख सर्वथा ।
तया वेदवादरतां ।
मनीं वसे ॥ २५५ ॥
त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन ।
निर्द्वंद्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् ॥ ४५ ॥
तिन्हीं गुणीं आवृत ।
हे वेद जाणैं निभ्रांत ।
म्हणौनि उपनिषदादि समस्त ।
सात्विक तें ॥ २५६ ॥
येर रजतमात्मक ।
जेथ निरूपिजे कर्मादिक ।
जे केवळ स्वर्गसूचक ।
धनुर्धरा ॥ २५७ ॥
म्हणौनि तूं जाण ।
हे सुखदुःखांसीच कारण ।
एथ झणें अंतःकरण ।
रिगों देसी ॥ २५८ ॥
तूं गुणत्रयातें अव्हेरीं ।
मी माझें हें न करीं ।
एक आत्मसुख अंतरीं ।
विसंब झणीं ॥ २५९ ॥
यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके ।
तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः ॥ ४६ ॥
जरी वेदें बहुत बोलिलें ।
विविध भेद सूचिले ।
तर्ही आपण हित आपुलें ।
तेंचि घेपें ॥ २६० ॥
जैसा प्रगटलिया गभस्ती ।
अशेषही मार्ग दिसती ।
तरी तेतुलेहि काय चालिजती ।
सांगैं मज ॥ २६१ ॥
कां उदकमय सकळ ।
जर्ही जाहले असें महीतळ ।
तरी आपण घेपें केवळ ।
आर्तीचिजोगें ॥ २६२ ॥
तैसें ज्ञानीये जे होती ।
ते वेदार्थातें विवरिती ।
मग अपेक्षित तें स्वीकारिती ।
शाश्वत जें ॥ २६३ ॥
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥ ४७ ॥
म्हणोनि आइकें पार्था ।
याचिपरी पाहतां ।
तुज उचित होय आतां ।
स्वकर्म हें ॥ २६४ ॥
आम्हीं समस्तही विचारिलें ।
तंव ऐसेचि हें मना आलें ।
जें न सांडिजे तुवां आपुलें ।
विहित कर्म ॥ २६५ ॥
परी कर्मफळीं आस न करावी ।
आणि कुकर्मीं संगति न व्हावी ।
हे सत्क्रियाचि आचरावी ।
हेतूविण ॥ २६६ ॥
योगस्थः कुरु कर्माणि
सङ्गंत्यक्त्वा धनंजय ।
सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा
समत्वं योग उच्यते ॥ ४८ ॥
तूं योगयुक्त होऊनी ।
फळाचा संगु टाकुनी ।
मग अर्जुना चित्त देउनी ।
करीं कर्में ॥ २६७ ॥
परी आदरिलें कर्म दैवें ।
जरी समाप्तीतें पावे ।
तरी विशेषें तेथ तोषावें ।
हेंही नको ॥ २६८ ॥
कीं निमित्तें कोणें एकें ।
तें सिद्धी न वचतां ठाके ।
तरी तेथिंचेनि अपरितोखें ।
क्षोभावें ना ॥ २६९ ॥
आचरतां सिद्धी गेलें ।
तरी काजाची कीर आलें ।
परी ठेलियाही सगुण जहालें ।
ऐसेंचि मानीं ॥ २७० ॥
देखैं जेतुलालें कर्म निपजे।
तेतुलें आदिपुरुषीं अर्पिजे ।
तरी परिपूर्ण सहजें ।
जहालें जाणैं ॥ २७१ ॥
देखैं संतासंतकर्मीं ।
हें जें सरिसेंपण मनोधर्मीं ।
तेचि योगस्थिति उत्तमीं ।
प्रशंसिजे ॥ २७२ ॥
दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगाद्धनंजय ।
बुद्धौ शरणमन्विच्छ
कृपणाः फलहेतवः ॥ ४९ ॥
बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते ।
तस्माद्योगाय युज्यस्व योगः
कर्मसु कौशलम् ॥ ५० ॥
अर्जुना समत्व चित्ताचें ।
तेंचि सार जाणैं योगाचें ।
जेथ मन आणि बुद्धीचें ।
ऐक्य आथी ॥ २७३ ॥
तो बुद्धियोग विवरितां ।
बहुतें पाडें पार्था ।
दिसे हा अरुता ।
कर्मभागु ॥ २७४ ॥
परी तेंचि कर्म आचरिजे ।
तरीच हा योगु पाविजे ।
जें कर्मशेष सहजें ।
योगस्थिति ॥ २७५ ॥
म्हणौनि बुद्धियोगु सधरु ।
तेथ अर्जुना होई स्थिरु ।
मनें करीं अव्हेरु ।
फलहेतूचा ॥ २७६ ॥
जे बुद्धियोगा योजिले ।
तेचि पारंगत जाहले ।
इहीं उभयबंधीं सांडिले ।
पापपुण्यीं ॥ २७७ ॥
कर्मजं बुद्धियुक्ता हि
फलं त्यक्त्वा मनीषिणः ।
जन्मबन्धविनिर्मुक्ताः
पदं गच्छन्त्यनामयम् ॥ ५१ ॥
ते कर्मीं तरी वर्तती ।
परी कर्मफळा नातळती ।
आणि यातायाति न लोपती ।
अर्जुना तयां ॥ २७८ ॥
मग निरामयभरित ।
पावती पद अच्युत ।
ते बुद्धियोगयुक्त ।
धनुर्धरा ॥ २७९ ॥
यदा ते मोहकलिलं
बुद्धिर्व्यतितरिष्यति ।
तदा गन्तासि निर्वेदं
श्रोतव्यस्य श्रुतस्य च ॥ ५२ ॥
तूं ऐसा तैं होसी ।
जैं मोहातें यया सांडिसी ।
आणि वैराग्य मानसीं ।
संचरैल ॥ २८० ॥
मग निष्कळंक गहन ।
उपजेल आत्मज्ञान ।
तेणें निचाडें होईल मन ।
अपैसें तुझें ॥ २८१ ॥
तेथ आणिक कांहीं जाणावें ।
कां मागिलातें स्मरावें ।
हें अर्जुना आघवें ।
पारुषेल ॥ २८२ ॥
श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा
स्थास्यति निश्चला ।
समाधावचला बुद्धिस्तदा
योगमवाप्स्यसि ॥ ५३ ॥
इंद्रियांचिया संगति ।
जिये पसरु होतसे मति ।
ते स्थिर होईल मागुती ।
आत्मस्वरूपीं ॥ २८३ ॥
समाधिसुखीं केवळ ।
जैं बुद्धि होईल निश्चळ ।
तैं पावसी तूं सकळ ।
योगस्थिति ॥ २८४ ॥
अर्जुन उवाच ।
स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव ।
स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम् ॥ ५४ ॥
तेथ अर्जुन म्हणे देवा ।
हाचि अभिप्रावो आघवा ।
मी पुसेन आतां सांगावा ।
कृपानिधी ॥ २८५ ॥
मग अच्युत म्हणे सुखें ।
जें किरीटी तुज निकें ।
तें पूस पां उन्मेखें ।
मनाचेनि ॥ २८६ ॥
या बोला पार्थें ।
म्हणितलें सांग पां श्रीकृष्णातें ।
काय म्हणिपें स्थितप्रज्ञातें ।
वोळखों केवीं ॥ २८७ ॥
आणि स्थिरबुद्धि जो म्हणिजे ।
तो कैसिया चिन्हीं जाणिजे ।
जो समाधिसुख भुंजे ।
अखंडित ॥ २८८ ॥
तो कवणें स्थिती असे ।
कैसेनि रूपीं विलसे ।
देवा सांगावें हें ऐसें ।
लक्ष्मीपती ॥ २८९ ॥
तंव परब्रह्म अवतरणु ।
जो षडगुणाधिकरणु ।
तो काय तेथ नारायणु ।
बोलतु असे ॥ २९० ॥
श्रीभगवानुवाच ।
प्रजहाति यदा
कामान्सर्वान्पार्थ मनोगतान् ।
आत्मन्येवात्मना तुष्टः
स्थितप्रज्ञस्तदोच्यते ॥ ५५ ॥
म्हणे अर्जुना परियेसीं ।
जो हा अभिलाषु प्रौढ मानसीं ।
तो अंतराय स्वसुखेंसीं ।
करीतु असे ॥ २९१ ॥
जो सर्वदा नित्यतृप्तु ।
अंतःकरण भरितु ।
परी विषयामाजीं पतितु ।
जेणें संगें कीजे ॥ २९२ ॥
तो कामु सर्वथा जाये ।
जयाचें आत्मतोषीं मन राहे ।
तोचि स्थितप्रज्ञु होये ।
पुरुष जाणैं ॥ २९३ ॥
दुःखेष्वनुद्विग्नमनाः
सुखेषु विगतस्पृहः ।
वीतरागभयक्रोधः
स्थितधीर्मुनिरुच्यते ॥ ५६ ॥
नाना दुःखीं प्राप्तीं ।
जयासी उद्वेगु नाहीं चित्तीं ।
आणि सुखाचिया आर्ती ।
अडपैजेना ॥ २९४ ॥
अर्जुना तयाच्या ठायीं ।
कामक्रोधु सहजें नाहीं ।
आणि भयातें नेणें कहीं ।
परिपूर्णु तो ॥ २९५ ॥
ऐसा जो निरवधि ।
तो जाण पां स्थिरबुद्धि ।
जो निरसूनि उपाधि ।
भेदरहितु ॥ २९६ ॥
यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम् ।
नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ५७ ॥
जो सर्वत्र सदा सरिसा ।
परिपूर्णु चंद्रु कां जैसा ।
अधमोत्तम प्रकाशा- ।
माजीं न म्हणे ॥ २९७ ॥
ऐसी अनवच्छिन्न समता ।
भूतमात्रीं सदयता ।
आणि पालटु नाहीं चित्ता ।
कवणें वेळे ॥ २९८ ॥
गोमटें कांहीं पावे ।
तरी संतोषें तेणें नाभिभवे ।
जो वोखटेनि नागवे ।
विषादासी ॥ २९९ ॥
ऐसा हरिखशोकरहितु ।
जो आत्मबोधभरितु ।
तो जाण पां प्रज्ञायुक्तु ।
धनुर्धरा ॥ ३०० ॥
यदा संहरते चायं
कूर्मोऽङ्गानीव सर्वशः ।
इंद्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य
प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ५८ ॥
कां कूर्म जियापरी ।
उवाइला अवेव पसरी ।
ना तरी इच्छावशें आवरी ।
आपुले आपण ॥ ३०१ ॥
तैसीं इंद्रियें आपैतीं होती ।
जयाचें म्हणितलें करिती ।
तयाची प्रज्ञा जाण स्थिति ।
पातली असे ॥ ३०२ ॥
विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः ।
रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते ॥ ५९ ॥
अर्जुना आणिकही एक ।
सांगेन ऐकें कवतिक ।
या विषयांतें साधक ।
त्यजिती नियमें ॥ ३०३ ॥
श्रेत्रादि इंद्रियें आवरिती ।
परि रसने नियमु न करिती ।
ते सहस्त्रधा कवळिजती ।
विषयीं इहीं ॥ ३०४ ॥
जैसी वरिवरि पालवी खुडिजे ।
आणि मुळीं उदक घालिजे ।
तरी कैसेनि नाशु निपजे ।
तया वृक्षा ॥ ३०५ ॥
तो उदकाचेनि बळें अधिकें ।
जैसा आडवेनि आंगें फांके ।
तैसा मानसीं विषो पोखे ।
रसनाद्वारें ॥ ३०६ ॥
येरां इंद्रियां विषय तुटे ।
तैसा नियमूं न ये रस हटें ।
जे जीवन हें न घटे ।
येणेंविण ॥ ३०७ ॥
मग अर्जुना स्वभावें ।
ऐसियाही नियमातें पावे ।
जैं परब्रह्म अनुभवें ।
होऊनि जाइजे ॥ ३०८ ॥
तैं शरीरभाव नासती ।
इंद्रियें विषय विसरती ।
जैं सोहंभाव प्रतीति ।
प्रगट होय ॥ ३०९ ॥
यततो ह्यपि कौन्तेय
पुरुषस्य विपश्चितः ।
इन्द्रियाणि प्रमाथीनि
हरन्ति प्रसभं मनः ॥ ६० ॥
येर्हवीं तरी अर्जुना ।
हें आया नये साधना ।
जे राहटताती जतना ।
निरंतर ॥ ३१० ॥
जयातें अभ्यासाची घरटी ।
यमनियमांची ताटी ।
जे मनातें सदा मुठी ।
धरूनि आहाती ॥ ३११ ॥
तेही किजती कासाविसी ।
या इंद्रियांची प्रौढी ऐसी ।
जैसी मंत्रज्ञातें विवसी ।
भुलवी कां ॥ ३१२ ॥
देखैं विषय हे तैसे ।
पावती ऋद्धिसिद्धिचेनि मिषें ।
मग आकळिती स्पर्शें ।
इंद्रियांचेनि ॥ ३१३ ॥
तिये संधीं मन जाये ।
मग अभ्यासीं ठोठावलें ठाये ।
ऐसें बळकटपण आहे ।
इंद्रियांचें ॥ ३१४ ॥
तानि सर्वाणि संयम्य
युक्त आसीत मत्परः ।
वशे हि यस्येन्द्रियाणि
तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ६१ ॥
म्हणौनि आइकें पार्था ।
यांतें निर्दळी जो सर्वथा ।
सर्व विषयीं आस्था ।
सांडूनियां ॥ ३१५ ॥
तोचि तूं जाण ।
योगनिष्ठेसी कारण ।
जयाचे विषयसुखें अंतःकरण ।
झकवेना ॥ ३१६ ॥
जो आत्मबोधयुक्तु ।
होऊनि असे सततु ।
जो मातें हृदयाआंतु ।
विसंबेना ॥ ३१७ ॥
येर्हवीं बाह्य विषय तरी नाहीं ।
परी मानसीं होईल जरी कांहीं ।
तरी साद्यंतुचि पाहीं ।
संसारु असे ॥ ३१८ ॥
जैसा कां विषाचा लेशु ।
घेतलियां होय बहुवसु ।
मग निभ्रांत करी नाशु ।
जीवितासी ॥ ३१९ ॥
तैसी विषयाची शंका ।
मनीं वसती देखा ।
घातु करी अशेखा ।
विवेकजाता ॥ ३२० ॥
ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते ।
सङ्गात्संजायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते ॥ ६२ ॥
क्रोधाद्भवति संमोहः
संमोहात्स्मृतिविभ्रमः ।
स्मृतिभ्रंशाद्बुद्धिनाशो
बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥ ६३ ॥
जरी हृदयीं विषय स्मरती ।
तरी निसंगाही आपजे संगती ।
संगें प्रगटे मूर्ति ।
अभिलाषाची ॥ ३२१ ॥
जेथ कामु उपजला ।
तेथ क्रोधु आधींचि आला ।
क्रोधीं असे ठेविला ।
संमोह जाणें ॥ ३२२ ॥
संमोहा जालिया व्यक्ति ।
तरी नाशु पावे स्मृति ।
चडवातें ज्योति ।
आहत जैसी ॥ ३२३ ॥
कां अस्तमानीं निशी ।
जैसी सूर्य तेजातें ग्रासी ।
तैसी दशा स्मृतिभ्रंशीं ।
प्राणियांसी ॥ ३२४ ॥
मग अज्ञानांध केवळ ।
तेणें आप्लविजे सकळ ।
तेथ बुद्धि होय व्याकुळ ।
हृदयामाजीं ॥ ३२५ ॥
जैसें जात्यंधा पळणीं पावे ।
मग ते काकुळती सैरा धांवे ।
तैसें बुद्धीसि होती भंवे ।
धनुर्धरा ॥ ३२६ ॥
ऐसा स्मृतिभ्रंशु घडे ।
मग सर्वथा बुद्धि अवघडे ।
तेथ समूळ हें उपडे ।
ज्ञानजात ॥ ३२७ ॥
चैतन्याच्या भ्रंशीं ।
शरीरा दशा जैशी ।
तैसें पुरुषा बुद्धिनाशीं ।
होय देखैं ॥ ३२८ ॥
म्हणौनि आइकें अर्जुना ।
जैसा विस्फुलिंग लागे इंधना ।
मग तो प्रौढ जालिया त्रिभुवना ।
पुरों शके ॥ ३२९ ॥
तैसें विषयांचें ध्यान ।
जरी विपायें वाहे मन ।
तरी येसणें हें पतन ।
गिंवसित पावे ॥ ३३० ॥
रागद्वेषवियुक्तैस्तु
विषयानिन्द्रियैश्चरन् ।
आत्मवश्यैर्विधेयात्मा
प्रसादमधिगच्छति ॥ ६४ ॥
म्हणौनि विषय हे आघवे ।
सर्वथा मनौनि सांडावे ।
मग रागद्वेष स्वभावें ।
नाशतील ॥ ३३१ ॥
पार्था आणिकही एक ।
जरी नाशले रागद्वेष ।
तरी इंद्रियां विषयीं बाधक ।
रमतां नाहीं ॥ ३३२ ॥
जैसा सूर्य आकाशगतु ।
रश्मिकरें जगातें स्पर्शतु ।
तरी संगदोषें काय लिंपतु ।
तेथिचेनि ॥ ३३३ ॥
तैसा इंद्रियार्थीं उदासीन ।
आत्मरसेंचि निर्भिन्न ।
जो कामक्रोधविहीन ।
होऊनि असे ॥ ३३४ ॥
तरी विषयां तयां कांहीं ।
आपणपेंवांचूनि नाहीं ।
मग विषय कवण कायी ।
बाधितील कवणा ॥ ३३५ ॥
जरी उदकीं उदक बुडिजे ।
कां अग्नि आगी पोळिजे ।
तरी विषयसंगे आप्लविजे ।
परिपूर्णु तो ॥ ३३६ ॥
ऐसा आपणचि केवळु ।
होऊनि असे निखळु ।
तयाचि प्रज्ञा अचळु ।
निभ्रांत मानीं ॥ ३३७ ॥
प्रसादे सर्वदुःखानां
हानिरस्योपजायते ।
प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः
पर्यवतिष्ठते ॥ ६५ ॥
देखैं अखंडित प्रसन्नता ।
आथी जेथ चित्ता ।
तेथ रिगणें नाहीं समस्तां ।
संसारदुःखां ॥ ३३८ ॥
जैसा अमृताचा निर्झरु ।
प्रसवे जयाचा जठरु ।
तया क्षुधेतृषेचा अडदरु ।
कहींचि नाहीं ॥ ३३९ ॥
तैसें हृदय प्रसन्न होये ।
तरी दुःख कैचें कें आहे ? ।
तेथ आपैसी बुद्धि राहे ।
परमात्मरूपीं ॥ ३४० ॥
जैसा निर्वातीचा दीपु ।
सर्वथा नेणें कंपु ।
तैसा स्थिरबुद्धि स्वस्वरूपु ।
योगयुक्तु ॥ ३४१ ॥
नास्ति बुद्धिरयुक्तस्य न
चायुक्तस्य भावना ।
न चाभावयतः शांतिरशान्तस्य
कुतः सुखम् ॥ ६६ ॥
ये युक्तीची कडसणी ।
नाहीं जयाच्या अंतःकरणीं ।
तो आकळिला जाण गुणीं ।
विषयादिकीं ॥ ३४२ ॥
तया स्थिरबुद्धि पार्था ।
कहीं नाहीं सर्वथा ।
आणि स्थैर्याची आस्था ।
तेही नुपजे ॥ ३४३ ॥
निश्चळत्वाची भावना ।
जरी नव्हेचि देखैं मना ।
तरी शांति केवीं अर्जुना ।
आपु होय ॥ ३४४ ॥
जेथ शांतीचा जिव्हाळा नाहीं ।
तेथ सुख विसरोनि न रिगे कहीं ।
जैसा पापियाच्या ठायीं ।
मोक्षु न वसे ॥ ३४५ ॥
देखैं अग्निमाजीं घापती ।
तियें बीजें जरी विरूढती ।
तरी अशांता सुखप्राप्ती ।
घडों शके ॥ ३४६ ॥
म्हणौनि अयुक्तपण मनाचें ।
तेंचि सर्वस्व दुःखाचें ।
या कारणें इंद्रियांचें ।
दमन निकें ॥ ३४७ ॥
इन्द्रियाणां हि चरतां
यन्मनोऽनु विधीयते ।
तदस्य हरति प्रज्ञां
वायुर्नावमिवाम्भसि ॥ ६७ ॥
इंद्रियें जें जें म्हणती ।
तें तेंचि जे पुरुष करिती ।
ते तरलेचि न तरती ।
विषयसिंधु ॥ ३४८ ॥
जैसी नाव थडिये ठाकितां ।
जरी वरपडी होय दुर्वाता ।
तरी चुकलाही मागौता ।
अपावो पावे ॥ ३४९ ॥
तैसीं प्राप्तेंही पुरुषें ।
इंद्रियें लाळिलीं जरी कौतुकें ।
तरी आक्रमिला जाण दुःखें ।
संसारिकें ॥ ३५० ॥
तस्माद्यस्य महाबाहो
निगृहीतानि सर्वशः ।
इंद्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य
प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ६८ ॥
म्हणौनि आपुलीं आपणपेया ।
जरी इंद्रियें येती आया ।
तरी अधिक कांहीं धनंजया ।
सार्थक असे ? ॥ ३५१ ॥
देखैं कूर्म जियापरी ।
उवाइला अवेव पसरी ।
ना तरी इच्छावशें आवरी ।
आपणपेंचि ॥ ३५२ ॥
तैसीं इंद्रियें आपैतीं होती ।
जयाचें म्हणितलें करिती ।
तयाची प्रज्ञा जाण स्थिती ।
पातली असे ॥ ३५३ ॥
आतां आणिक एक गहन ।
पूर्णाचें चिन्ह ।
अर्जुना तुज सांगैन ।
परिस पां ॥ ३५४ ॥
या निशा सर्वभूतानां
तस्यां जागर्ति संयमी ।
यस्यां जाग्रति भूतानि सा
निशा पश्यतो मुनेः ॥ ६९ ॥
देखैं भूतजात निदेलें ।
तेथेंचि जया पाहलें ।
आणि जीव जेथ चेइलें ।
तेथ निद्रितु जो ॥ ३५५ ॥
तोचि तो निरुपाधि ।
अर्जुना तो स्थिरबुद्धि ।
तोचि जाणें निरवधि ।
मुनीश्वर ॥ ३५६ ॥
आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं
समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् ।
तद्वत्कामा यं प्रविशन्ति सर्वे
स शांतिमाप्नोति न कामकामी ॥ ७० ॥
पार्था आणीकही परी ।
तो जाणों येईल अवधारीं ।
जैसी अक्षोभता सागरीं ।
अखंडित ॥ ३५७ ॥
जर्ही सरितावोघ समस्त ।
परिपूर्ण होऊनि मिळत ।
तर्ही अधिक नोहे ईषत् ।
मर्यादा न संडी ॥ ३५८ ॥
ना तरी ग्रीष्मकाळीं सरिता ।
शोषूनि जाती समस्ता ।
परी न्यून नव्हे पार्था ।
समुद्रु जैसा ॥ ३५९ ॥
तैसा प्राप्तीं ऋद्धिसिद्धीं ।
तयासि क्षोभु नाहीं बुद्धी ।
आणि न पवतां न बाधी ।
अधृति तयातें ॥ ३६० ॥
सांगैं सूर्याच्या घरीं ।
प्रकाशु काय वातीवेरी ।
कां न लविजे तरी अंधारीं ।
कोंडेल तो ॥ ३६१ ॥
देखैं ऋद्धिसिद्धि तयापरी ।
आली गेली से न करी ।
तो विगुंतला असे अंतरीं ।
महासुखीं ॥ ३६२ ॥
जो आपुलेनि नागरपणें ।
इंद्रभुवनातें पाबळें म्हणे ।
तो केवीं रंजे पालिवणें ।
भिल्लांचेनि ? ॥ ३६३ ॥
जो अमृतासी ठी ठेवी ।
तो जैसा कांजी न सेवी ।
तैसा स्वसुखानुभवी ।
न भोगी ऋद्धि ॥ ३६४ ॥
पार्था नवल हें पाहीं ।
जेथ स्वर्गसुख लेखनीय नाहीं ।
तेथ ऋद्धिसिद्धी कायी ।
प्राकृता होती ॥ ३६५ ॥
विहाय कामान्यः
सर्वान्पुमांश्चरति निःस्पृहः ।
निर्ममो निरहंकारः
स शांतिमधिगच्छति ॥ ७१ ॥
ऐसा आत्मबोधें तोषला ।
जो परमानंदें पोखला ।
तोचि स्थिरप्रज्ञु भला ।
वोळख तूं ॥ ३६६ ॥
तो अहंकारातें दंडुनी ।
सकळ कामु सांडोनी ।
विचरे विश्व होऊनी ।
विश्वामाजीं ॥ ३६७ ॥
एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ
नैनां प्राप्य विमुह्यति ।
स्थित्वास्यामन्तकालेऽपि
ब्रह्मनिर्वाणमृच्छति ॥ ७२ ॥
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगोनाम
द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥
हे ब्रह्मस्थिति निःसीम ।
जे अनुभवितां निष्काम ।
ते पावले परब्रह्म ।
अनायासें ॥ ३६८ ॥
जे चिद्रूपीं मिळतां ।
देहांतीचि व्याकुळता ।
आड ठाकों न सके चित्ता ।
प्राज्ञा जया ॥ ३६९ ॥
तेचि हे स्थिति ।
स्वमुखें श्रीपति ।
सांगत अर्जुनाप्रति ।
संजयो म्हणे ॥ ३७० ॥
ऐसें कृष्णवाक्य ऐकिलें ।
तेथ अर्जुनें मनीं म्हणितलें ।
आतां आमुचियाचि काजा कीर आलें ।
उपपत्ति इया ॥ ३७१ ॥
जें कर्मजात आघवें ।
एथ निराकारिलें देवें ।
तरी पारुषलें म्यां झुंजावें ।
म्हणौनियां ॥ ३७२ ॥
ऐसा श्रीअच्युताचिया बोला ।
चित्तीं धनुर्धरु उवाइला ।
आतां प्रश्नु करील भला ।
आशंकोनी ॥ ३७३ ॥
तो प्रसंगु असे नागरु ।
जो सकळ धर्मासी आगरु ।
कीं विवेकामृतसागरु ।
प्रांतहीनु ॥ ३७४ ॥
जो आपण सर्वज्ञनाथु ।
निरूपिता होईल श्रीअनंतु ।
ज्ञानदेवो सांगेल मातु ।
निवृत्तिदासु ॥ ३७५ ॥
इति श्रीज्ञानदेवविरचितायां
भावार्थदीपिकायां द्वितीयोऽध्यायः ॥