मराठी कविता- २
स्वगृह- टाईमपास मराठी कविता-१
गूढ
खरंच........! गूढच म्हणायचं हे. हे पृथ्वीतलावरचं रहाटगाडगं कसं काय चालतं हे एक मोठं कोडंच आहे. शास्त्रीय दृष्टीने प्रत्येक गोष्टीला कारणं असतील सुद्धा. पण हे सगळं घडवणारा तो कोणी तरी आहे हे नक्की. प्रत्येक गोष्टीचं वळण अगदी ठरलेलं...... आखून दिलेलं.
अजाण त्या कळीस तो
भमर कसा भेटतो
गूढ उकले ना परी
कितीही शोधिले जरी
जशी धरा आतूरते
गगनाच्या मीलना
जशी सरीता धावते
सागराच्या वळणा
कसे कुणी अनुसरीले
कुणी कुणा शिकवीले
प्रकृतीच्या आर्तक्याचे
चलन कुणी लाविले
काय शोधी तू मना
गुपीत का करी खुले
गूढ अंतरातले
कुणा कधी न सापडे
हृदय पाखरु
रुंजी घालती तुझ्या सयी रे, माझ्या या हृदयी
कसे आवरु हृदय पाखरु, सांग मला काही
तो जर असता आज इथे तर
तो जर नसता आज तिथे तर
जर तरच्या द्वंद्वात अडकले, खिन्न दिशा दाही
कसे आवरु हृदय पाखरु, सांग मला काही
मन लागेना कशात माझे
सूर तयाचा कानी वाजे
देहभान रे हरपून आता, वाट तुझी पाही
कसे आवरु हृदय पाखरु, सांग मला काही
धावत ये ना, मिठीत घे ना
तोडीत ये ना वृथा बंधना
माझी नव्हते कधीच मी रे, फ़क्त तुझी राही
कसे आवरु हृदय पाखरु, सांग मला काही
श्रावणधारा
रंगत येती तरंगत येती
जलदांमधूनी धावत येती
श्रावणधारा, जलदाधारा
धुंद वादळी, कापीत वारा
बहरत येती, मोहरत येती
सप्त सूर ते छेडीत येती
लाटा धाडून सागर मग तो
आसूसून ही वाट पाहतो
सरीता वाहे भान हरपूनी
सवे तयाच्या मीलन पाही
इंद्रधनूच्या कमानीतूनी
घेई चुंबन वेडी अवनी
भारुन जाई सारी धरती
पावसास त्या घेऊन कवनी
नि:शब्द आता सारा परिसर
मृद्गंधाचा ओला गहिवर
आठवणी त्या व्याकुळ नयनी
ठेवूनी जाई रंगीत गगनी