गीत ज्ञानेश्वरी, नादचित्र क्र. १ - वायां मन हें नांव

वाया मन हे नाव या "गीत ज्ञानेश्वरी" मधल्या दुस-या नादचित्रामध्ये ज्ञानदेवांनी मानवी मनाच्या गुणधर्माचे अत्यंत सुंदर आणि अचूक वर्णन केले आहे. पहिल्या ओवीमध्ये आपण या मनाच्या संगतीमुळे अनंतरूपामधून व्यक्तीरूपामध्ये आलो आहोत असे तत्त्वज्ञान सांगितले आहे. दुस-या आणि तिस-या ओवीमध्ये संपूर्ण मानसशास्त्राचे सार पकडले आहे.

We present the philosophical wisdom of Saint Dnyaneshwar in musical form. Selected verses from Dnyaneshwari sung in this song are translated for everybody.

ज्ञानेश्वरी, अध्याय १३

वायां मन हें नांव । एऱ्हवीं तरी कल्पनाचि सावेव । जयाचेनि संगें जीव- । दशा वस्तु ॥ ११० ॥ There is nothing like mind. It’s our thoughts indeed. Through thoughts, the infinite universal self assumes limited individuality.

संकल्पें सृष्टी घडी । सवेंचि विकल्पोनि मोडी । मनोरथांच्या उतरंडी । उतरी रची ॥ ११४ ॥

Our mind creates a world and on second thought, it destroys it! It builds heaps of fantasies and then shatters it. Again, builds it and goes on and on… ज्ञानेश्वरी, अध्याय ६

हें मन कैसें केवढें । पाहों म्हणों तरी न सांपडें । एऱ्हवी राहाटावया थोडें । त्रैलोक्य यया ॥ ४१२ ॥ What is the nature and extent of our mind? It is so elusive that nobody can find it. But whole world is not enough to satiate it.

गीत ज्ञानेश्वरी, नादचित्र क्र. २ - सवर्म ह्रदयकल्हारी

"गीत ज्ञानेश्वरी" मधले दुसरे नादचित्र "सवर्म ह्रदयकल्हारी" या गाण्यात एकूण ४ ओव्या आहेत. या ओव्यांमध्ये ज्ञानदेवांनी अर्जुनाच्या ह्रदयातली द्विधा अवस्था, आपल्याच बांधवांशी युध्द करावे लागणार याची चिंता, त्यांच्या विषयीचा जिव्हाळा, उद्विग्नता, दुःख, हताशपणा अशा भावनांचा होणारा कल्लोळ यांचे अप्रतिम चित्रण केले आहे. अर्जुनाची अवघड मनःस्थिती ओळखून श्रीकृष्ण त्याच्या मदतीला कसा धाऊन येतो, ज्यामुळे अर्जुनाला आपल्या भावनांना आवर घालून प्राप्त परिस्थितीमध्ये युद्धाला सामोरे जायला हावे, असा आशय असलेल्या स्फूर्तीदायक, वीर रस निर्माण करणा-या या ओव्या आहेत. ज्ञानदेवांनी भावविवश अर्जुनाला उन्हाळ्यात वणवा लागलेल्या पर्वताची उपमा दिली आहे. परंतू आता नीळा मेघरूपी श्रीकृष्ण बरसेल आणि हा वणवा विझेल व या पर्वतावर पुन्हा नवीन उन्मेशाची, विचारांची हिरवीगार पालवी फुटेल, असे पुढील ओव्यांमध्ये अतिशय बहारदार वर्णन आहे...

गीत ज्ञानेश्वरी, अभंग १ आतसिकुसुमकोशशामघनु

परितोष, त्यानं यमन रागामध्ये रचलेली अत्यंत सुरेल आणि तालबध्द अशी धुन वाजवत होता. तल्लीन करणारी ती धुन कानावर पडताच मी म्हणालो यावर ज्ञानेश्वरांचा निळाईचा अभंग बसवायला हवा ! गाथा उघडली, दोनचार पाने उलटली, आणि एकामागून एक असे शब्दांचे मोती वेचत, आम्ही दोघांनी गायला सुरूवात केली .... आतसि...कुसुम...कोश...शाम...घनु .... या अभंगातून ज्ञानेशांचे शब्दसामर्थ्य आणि काव्यप्रतिभा वेगळाच अनुभव देऊन जाते. या शब्दांना यमनातूनच ओघळायचं असावं असं मला वाटलं ! या अभंगाचा अर्थ खालीलप्रमाणे ...

जवसाच्या निळसर रंगाच्या फुलांप्रमाणे आणि पावसाच्या मेघांप्रमाणे कांती असलेल्या श्रीकृष्णामुळे तुळशीवृंदावनामध्ये ध्यानस्थ ऋषी मुनींची ह्रदयरूपी कमळे उमलून विशाल झाली आहेत हा विश्वसागरामध्ये काळरूपी सर्पावर (शेषशायी) पहुडणारा, आणि ज्याच्यामुळे चंदनाला सुगंध आहे, असा हा विठ्ठलु जो या विश्वाचा निर्माता आहे, तो केवळ अंतर्बाह्य आनंदमूर्ती आहे...

गीत ज्ञानेश्वरी, अभंग २ मन्ही बागलाणी भाष

गीत ज्ञानेश्वरीतले ज्ञानेशांचे बागलाणी भाषेमधले अतिशय अनोखे असे काव्यरत्न आपणापुढे सादर करीत आहोत. परितोषने या गाण्याला अप्रतिम संगीत दिले आहे, त्यामुळे हे गाणं हेडफोनवर ऐकल्यास जास्त प्रत्ययकारी अनुभव देऊन जाईल. ज्ञानेशांनी हे गाणे बागलाणी गवळणीच्या भूमिकेतून रचले आहे. बागलाणी भाषा गुजरात आणि नाशिकच्या सीमेवरील भागात बोलली जाते.

मे दुरर्थी कर जोडुं । ता-हो सेवा न जाणुं ।।१।। मन्हा रे कान्हा मन्हा रे कान्हा । देखी कां न गिणा रे । मन्हा कान्हा रे ।।२।। तन्हा मराठा देश । मन्ही बागलाणी भाष ।।३।। घटि पटि विजार । खंडे भाले तरवार । बापरखुमादेविवरु जाण । ऐसें मन्हा कान्हा ।

या अभंगाचा सरल भावार्थ -

मी तुला दुरूनच हात जोडते, तुझी सेवा कशी करायची, हे खरंच कळत नाही रे, माझ्या कान्हा ! तुझ्या अगणित रूपांची मोजदाद मी कशी करू रे माझ्या कान्हा ? अरे माझ्या कान्हा, तू महाराष्ट्र देशात राहतोस, मग माझी बागलाणी भाषा तुला कळणार का ? म्हणून मी तुला दुरूनच हात जोडते.घटामधले अवकाश घटाकार आणि वेगळे भासले तरी अवकाश हे एकसंध असते, किंवा वस्त्रांचे आकार व रंग विविध भासले तरी त्यातले कापड केवळ एका धाग्यापासूनच बनलेलेे असते. (त्याप्रमाणे हे विश्व वैविध्याने भरले असले तरी त्यामागे एकच मूलतत्त्व आहे.)

असे अवघड तत्वविचार मला उमजत नाहीत. अशावेळी तुझे नाम हेच माझे ढाल तलवार बनून माझे रक्षण करतात. असा आहे माझा कान्हा !

गीत ज्ञानेश्वरी, अभंग ३ नीळवर्ण रजे नीळवर्ण बुझे

दिपावलीच्या निमित्ताने आपणासमोर गीत ज्ञानेश्वरीतला एक नवा अभंग घेऊन येत आहोत. "नीळवर्ण रजे नीळवर्ण बुझे" असे या निळाईच्या अभंगाचे बोल आहेत. ज्ञानेशांचे हे काव्य आपल्याला निळसर भासणा-या अनंतरूपाचा अनुभव देऊन जाते. एके दिवशी परीतोष मिश्र गोरख कल्याण रागामध्ये अत्यंत सुंदर धुन वाजवत होता. अर्थात त्यामध्ये हिंदुस्थानी आणि पाश्चात्य संगीताचे मिश्रण होते. मला ज्ञानेशांच्या निळाईच्या शब्दरत्नासाठी या स्वरांचे कोंदण अगदी चपखल बसेल असे प्रकर्षाने वाटले. हाच तो अभंग. हेडफोन वापरून ऐकल्यास अधिक श्रवणीय वाटेल. दिपावलीच्या आपणा सर्वांना खूप शुभेच्छा.

नीळवर्ण रजे नीळवर्ण बुझे । निळीमा सहजे आकारली ॥१॥

नीळप्रभा दिसे नीळपणे वसे । निळिया आकाशे हारपले ॥२॥

निळेपण ठेलें निळीये गोविलें। निळेपण सोविळें आम्हां झालें ॥३॥

ज्ञानदेवी निळा परब्रम्ही गोंवला । कृष्णमूर्ति सावळा हृदयी वसे ॥४॥


गीत ज्ञानेश्वरी, अभंग क्र. ४ गाई चालल्या वनाप्रती

ज्ञानदेवांच्या अभंग गाथेमध्ये अनेक अभंग असे आहेत कि त्या अभंगांवर एखादी नृत्यनाटीका बसवता येऊ शकते. या अभंगांमध्ये ज्ञानदेवांनी कृष्णाच्या जीवनातील अनेक प्रसंग चितारले आहेत. हे लक्षात आल्यावर, जवळपास वीस वर्षांपूर्वी मी अशा निवडक अभंगांना चाली लावल्या होत्या. त्यातलाच एक अभंग आम्ही नवीन रंगरूपात सादर केला आहे. परितोषने या अभंगाला एकदम आधुनिक असे संगीत दिले आहे. "गाई चालल्या वनाप्रती, सवे पेंधा चाले सांगाती", असे या अभंगाचे बोल आहेत. या अभंगाचा शेवट "ज्ञानदेव सवे सवंगडा लाठा, गाई हाकितो गोठणा तटा", असा होतो. याचा अर्थ असा कि कृष्ण आणि पेंद्याबरोबर ज्ञानेश्वर देखील त्यांचा सवंगडी बनून, हातात काठी घेउन गाई हाकीत आहेत. याप्रकारे अतिशय रम्य असे वर्णन पहायला मिळते.

गायी चालिल्या वनाप्रती । सवें पेंधा चाले सांगाती ।। १ ।।

वळि गोवळिया कान्होबा । यमुने पाण्या नेई तुं बा ।। धृ ।।

पांवया छंदे परतल्या गाई । विसरल्या चारा तल्लीन ठाई ।। २ ।।

ज्ञानदेव सवे सवंगडा लाठा । गाई हाकितो गोठणा तटा ।। ३ ।।


गीत ज्ञानेश्वरी, नादचित्र क्र. ४ अक्षरे पुसिल्या न पुसे अर्थू जैसा

हे स्थूल विश्व जरी नष्ट झाले तरी त्यामागचा सूक्ष्म अविनाशी शक्ती स्त्रोत तसाच शिल्लक राहातो हे समजावून सांगताना ज्ञानदेव म्हणतात "अक्षरे पुसिल्या न पुसे अर्थू जैसा" हे आहेत. म्हणजे लिहीलेली अक्षरे पुसून टाकली किंवा नष्ट केली तरीही अर्थ पुसता येत नाही. तो कधीही नष्ट होत नाही पण तो अव्यक्त अवस्थेमध्ये जातो.

Writing can be erased but the meaning shall persist forever!

या ओवीतून ज्ञानदेवांच्या आपार काव्यप्रतिभेचे आणि तत्वज्ञानाचे दर्शन होते. परितोषने पियानो, गिटार, ड्रम्स, किबोर्ड आणि संगीत तसेच डिजिटल संकलन करून या गीत ज्ञानेश्वरीच्या प्रकल्पाला मोठा हातभार लावला आहे. तसेच सर्व रेकॉर्डींग घरीच करण्यात आले आहे. गीत ज्ञानेश्वरीतील या गाण्यातल्या निवडक ओव्या खालील प्रमाणे....

अध्याय ८

जें हें विश्वचि होऊनि असे । परि विश्वपण नासिलेनि न नासे । अक्षरें पुसिल्या न पुसे । अर्थु जैसा ॥ १७६।।

It has manifested in the physical form of universe. But when this universe is destroyed it persists till eternity, just as the writing can be erased but the meaning remains forever!

अध्याय २

तैसें आदीचि जें नाही । तयालागीं तूं रुदसि कायी । तूं अवीट तें पाहीं । चैतन्य एक ॥ १६९ ॥

Why do you grieve for the physical form, which is so perishable? Consider instead the eternal source of life energy that shines through everything.

गीत ज्ञानेश्वरी, ओवी गीत क्र. ५ कां वोघ सांडूनि गांग

गीत ज्ञानेश्वरी या श्रुंखलेमधील हे गाणं आपल्या मनाला शांत करण्यासाठी आणि ध्यान करण्यासाठी सुयोग्य आहे. परितोषने अधुनिक संगीत देत असताना विषयाचा भाव घट्ट पकडून ठेवला आहे हे विशेष! या गाण्यामध्ये ज्ञानेश्वरीतील अध्याय क्र. १४ आणि १५ मधील एकूण ३ ओव्या निवडल्या आहेत. ज्ञानदेवांनी या ओव्यांमध्ये गंगा नदी (गांग), समुद्र, मीठापासून बनवलेली हत्तीणीची मूर्ती (लवणाची कुंजरी) आणि पाण्यावरचा तरंग (तरंगु लहानु) ही रूपके metaphors वापरले आहेत. या ओव्यांचा थोडक्यात अर्थ खालील प्रमाणे ...

अध्याय १४

कां वोघ सांडूनि गांग । रिघोनि समुद्राचें आंग । निस्तरली लगबग । खळाळाची ॥३५३॥

गंगा जेव्हा सागराला जाऊन मिळते तेव्हा तिचं खळखळणं थांबून ती समुद्रासारखी गंभीर होते. त्या नदीप्रमाणे आपलं मन चंचल, उथळ आणि सतत चळवळ करणार असतं पण ते जेव्हा परमात्म्याशी एकरूप होतं तेव्हा ते समुद्रासारखं विशाल आणि धीरगंभीर होतं.

Just as the stream of Ganga merges in the vastness of the ocean it stops being turbulent and thunderous. The river loses a smaller identity and becomes the ocean.

अध्याय १५

कां लवणाची कुंजरी । सूदलिया लवणसागरीं । होयचि ना माघारी । परती जैसी ॥ ३१८ ॥

मिठापासून बनवलेली हत्तीणीची मूर्ती सागरात सोडल्यावर (सूदलिया) ती विरघळून सागरमय होऊन जाते. ती परत माघारी येत नाही. यामधून ज्ञानदेव असे सांगताहेत कि परमात्म्याशी एकरुप झाल्यावर आपलं संकुचित व्यक्तीरूप मावळून जातं. ज्याप्रमाणे नदी नाले समुद्राला जाऊन मिळाले कि त्यांचे नाव गाव संपून जाते आणि ते अथांग समुद्रच होऊन जातात.

An elephant made of salt, when immersed in the sea, never returns to the shore. It dissolves and remains in union with the sea.

अध्याय १४

हो कां तरंगु लहानु । परी सिंधूसी नाहीं भिन्नु । तैसा ईश्वरीं मी आनु । नोहेचि मा ॥ ३८६ ॥

शेवटची ओवी अत्यंत उत्कट सौंद-याची अनुभूति देणारी आहे. त्यामध्ये ज्ञानदेव म्हणतात, समुद्रातला एखादा तरंग कितीही छोटासा असला तरीही तो साक्षात समुद्रच असतो. त्याप्रमाणे मी कितीही हीन, दीन आणि क्षुल्लक भासलो तरीही या ईश्वरापासून भिन्न नाही.

However tiny a wave may be but it is inseparable from this vast ocean. That wave is the ocean itself. In the same way, however insignificant my existence be, I am no different from Ishwara.

गीत ज्ञानेश्वरी, ओवी गीत क्र. ६ तरी मारें उणें काळकुट (राजसगुणी आहार वर्णन)

भारतीय तत्त्वज्ञानाप्रमाणे माणसांची प्रकृती आणि स्वभाव वैशिष्ट्ये सत्व, रज, तम या त्रिगुणांच्या प्रभावानुसार बदलतात. ज्ञानेश्वरीमध्ये या त्रिगुणांच्या प्रादुर्भावानुसार माणसांचे आहार व आवडीनिवडी कशा असतात त्याचे अतिशय सुरस आणि चविष्ट वर्णन सापडते. ज्ञानेश्वरीमध्ये नवरसांची रेलचेल आहे, मग त्यात हास्यरसही आलाच. त्याचा प्रत्यय या रजोगुणी आहारावरील ओव्यांमधून होतो. तसेच ज्ञानदेवांच्या संयत विनोदबुद्धीचे आणि शब्दलालित्याचे अनोखे दर्शन होते. म्हणूनच आम्ही या राजसगुणी आहाराविषयीच्या ओव्या गायला घेतल्या. या वर्णनामागचा मुख्य उद्देश आपल्याला राजोगुणी आहारापासून परावृत्त करणे हा आहे कारण अशा मसालेदार जळजळीत खाण्यामुळे आपल्याला अनेक शरीर व्याधी जडू शकतात.

अर्थात हे वाचल्यावर आपल्यामध्ये रजोगुण फारच बळावला आहे, हे बहुतांच्या ध्यानात आल्याशिवाय राहणार नाही. तसेच हे गाणे ऐकून आपल्याला सत्व आणि तमोगुणी आहार कसा असतो ते ज्ञानेश्वरी उघडून नक्कीच वाचावेसे वाटेल. या ओव्यांमधून ज्ञानदेवांनी खाद्यपदार्थांचा उल्लेख न करता त्यांची चवीनुसार वैशिष्ट्ये दिली असल्यामुळे आम्ही आजच्या खाद्यसंस्कृतीप्रमाणे उदाहरणे दिलेली आहेत, ती अशी - कडूवट (कार्ले), पानचुना (दासट, जळजळीत), आम्ल (चिंच), आंबट खारट (कैरीचे लोणचे), कठीण (चिक्की) तीख (मिरच्या), उकळता चहा, वाफाळणारे सिजलर, सुपारी (राखेहून कोरडे), पेटलेलं पान, मोहरी घातलेल्या मिरच्या, कोशिंबीरी (बाहूबली थाळी)

तरी मारें उणें काळकुट । तेणें मानें जें कडुवट । कां चुनियाहूनि दासट । आम्ल हन ॥ १३९ ॥

एक मारकपणा वगळला तर आगदी विषासारखे कडूजहार, किंवा चुन्याहून दाहक आणि अतिशय आंबटजहार असे पदार्थ ह्याला भयंकर आवडतात ! Rajas people like food which is deadlier and more bitter than Kalkuta poison, sour, and which burns more fiercely than lime.

कणिकीतें जैसें पाणी । तैसेंचि मीठ बांधया आणी । तेतुलीच मेळवणी । रसांतरांची ॥ १४० ॥

कणिक मळताना आपण पिठात जेवढे पाणी घालतो तसा हा भोजनात आणि इतर खाण्याच्या पदार्थात मीठ कालवतो. They like to mix salt in their food as much as the water needed to make dough.

ऐसें खारट अपाडें । राजसा तया आवडे । ऊन्हाचेनि मिषें तोंडें । आगीचि गिळी ॥ १४१ ॥

खारट पदार्थांवर या राजसगुणी माणसाचे जिवापाड प्रेम असते आणि कढत तर इतकं आवडतं की जणू हा आगीचे धगधगते निखारेच तोंडात घालतो. Rajas people love salty foods and They prefer their food to be hot like swallowing fire.

वावदळ पडूनि ठाये । साबळु डाहारला आहे । तैसा तीख तो खाये । जें घायेविण रुपे ॥ १४३ ॥

वावटळीला मागे सारील असे हा ss हा ss करायला लावणारे किंवा पहारीचा घणाघाती घाव बसावा तसे जखम न करणारे पण वेदनादायी तिखट आणि झणझणीत पदार्थ तो खातो. They eat food so pungent and chilli that it could pierce rocks, though it passes through him without injury.

परस्परें दांतां । आदळु होय खातां । तो गा तोंडीं घेतां । तोषों लागे ॥ १४५ ॥

दातांवर दात आदळतील असे कठीण पदार्थ खाताना त्याला खूप चेव येतो! Rajas people enjoy eating food that requires grinding between teeth.

आणि राखेहूनि कोरडें । आंत बाहेरी येके पाडें । तो जिव्हादंशु आवडे । बहु तया ॥ १४४ ॥

राखेप्रमाणे कोरडे, ते धड गिळता येत नाहीत आणि तोंडातून बाहेरही पडत नाहीत असे पदार्थ, आणि तीव्र चवीतून जिभेला दंश करून घ्यायला त्याला प्रचंड आवडते. They like food that is drier than ashes, and they enjoy the sting of it on tongue.

आधींच द्रव्यें चुरमुरीं । वरी परवडिजती मोहरी । जियें घेतां होती धुवारी । नाकेंतोंडें ॥ १४६ ॥

आधीच चुरचुरीत असलेल्या पदार्थवर तो नाकामध्ये झुणझणारी मोहरी टाकतो, ज्यामुळे नाकातोंडातून जणू धूरच बाहेर यावा ! Even though the ingredients of this food are already pungent, he adds mustard to it so that it would smoke from nose and mouth.

हें असो उगें आगीतें । म्हणे तैसें राइतें । पढियें प्राणापरौतें । राजसासि गा ॥ १४७ ॥

अग्नीच्या ज्वाळाही फिक्या वाटाव्यात अशी मिरची कोशिंबीर या राजसगुणी माणसाला प्राणाहून प्रिय असते. Rajas people like their salads to be so chilli and burning hotter than fire!

अग्नीच्या ज्वाळाही फिक्या वाटाव्यात अशा तिखट आणि चविष्ट कोशिंबीरी या राजसगुणी माणसाला प्राणाहून प्रिय असतात. याप्रमाणे ज्ञानदेवांनी सत्व, रज, तम गुणांच्या व्यक्तींच्या खाण्याच्या आवडीनिवडींचे अत्यंत रसभरीत वर्णन विस्ताराने केले आहे. पण सर्वच ओव्या गाणं शक्य नाही म्हणून केवळ रजोगुणावरच्या निवडक आठ ओव्या संगीतबध्द केल्या आहेत.