श्रीरामचरितमानस प्रेमी मंडळ प्रस्तुत श्रीरामचरितमानस (मराठी)

श्रीरामचरितमानस प्रेमी मंडळ

प्रस्तुत

श्रीरामचरितमानस

श्रीप्रज्ञानानंद स्वामीकृत स्मश्लोकी समच्छंद मराठी अनुवाद

स्वगृह

बालकाण्ड

अयोध्याकाण्ड

अरण्यकाण्ड

किष्किंधाकाण्ड

सुंदरकाण्ड

लंकाकाण्ड

उत्तरकाण्ड

 

        श्रींचे पूर्वाश्रमीचे नाव श्री दत्तात्रेय नारायण कर्वे असे होते. त्यांचा जन्म वैशाख वद्य ३० शके १८१५ म्हणजे दि. १५ मे १८९३ रोजी माहीम (ता. पालघर, जिल्हा ठाणे) येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण बदलापूर येथे, माध्यमिक शिक्षण मुरुड जंजिरा येथे व महाविद्यालयीन शिक्षण बडोदा येथे झाले. इ. स. १९१८ मध्ये ते बी. ए. झाले व त्यानंतर एस. टी. सी. होऊन इ.स. १९३५ पर्यंत मुरबाड, वसई, डहाणू व चिंचणी तारापूर येथे त्यांनी शिक्षकाचे काम केले.

        इ. स. १९३१ मध्ये चिंचणी तारापूरला गोस्वामी तुलसीदासांचे एकनिष्ठ भक्त श्री बाबा गंगादास यांची व स्वामींची भेट झाली. त्यांच्या विरक्त, नित्य समाधानी आणि प्रेमळ वृत्तीमुळे स्वामी त्यांच्याकडे ओढले गेले. त्यांनीच स्वामींना गोस्वामी तुलसीदासांच्या श्रीरामचरितमानसाची गोडी लावली. त्यांच्या प्रेरणेने स्वामींनी एकाह, त्रिदिनात्मक, नवाह अशी शेकडो पारायणे केली. यावर श्री बाबा गंगादासजींनी रामायणाचा प्रसार करण्याचा आदेश देऊन 'तुझ्या मुखाने गोस्वामी बोलतील' असा अमोध आशीर्वाद दिला. त्यांच्या संगतीचा लाभ फक्त ५ - ७ वर्षे मिळाला. पण त्यांचा आदेश मात्र स्वामींनी आयुष्याच्या अखेरीपर्यंत पाळला.

        यानंतरच्या काळ अधिक प्रगतीचा ठरला. बालपणापासून अंतरी असणार्‍या धगधगीत वैराग्याचे स्वरूप प्रकट होण्याची वेळ आली. पौष शुद्ध १२ शके १८६४ (१८.१.१९४३) रोजी श्रींनी चतुर्थाश्रमाची दीक्षा खेड (जिल्हा पुणे) मुक्कामी घेतली. श्री ब्र. भू. प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज (पोटे स्वामी) आळे, यांच्याकडून दंड ग्रहण केला. त्यांच्या कृपाप्रसादाने श्रींची काव्यशक्ती जागृत होऊन अनेक काव्यग्रंथ निर्माण झाले. प्रथम श्रीरामचरितमानसाचा समवृत्त-समच्छंद मराठी अनुवाद अवघ्या तीन महिन्यात झाला. नंतर संगीत समश्लोकी गीता, अभिनव रामायण, वेदांतसार, अभंग रामायण, श्रीगुरुगीता-प्रबोधिनी, श्री ब्रह्मस्तुति (प्राकृत), श्रीवेदस्तुतिभास्कर (प्राकृत), श्रीपरमामृत प्रकाश (टीका), श्रीगीताकीर्तन तरंगिणी असे अनेक काव्यग्रंथ लिहून झाले. यानंतर श्रीरामचरित मानसावरील 'मानसगूढार्थचंद्रिका' हा सुमारे ७००० पृष्ठांचा बृहत्‌ टीका ग्रंथ मराठी व हिंदी दोन्ही भाषांत लिहून तुलसी मानसाचा द्वितीयानुवाद, व 'संध्योपासना' हा ग्रंथ लिहिला. हे कार्य चालू असता, वर्षानुवर्षे दररोज १८ ते २० तासपर्यंत लेखन कार्य केवळ रामप्रभूंची सेवा म्हणून श्री स्वामींनी केले !

        श्रींची काव्य प्रतिभा प्रासादिक, ओजस्वी व ओघवती आहे. संस्कृत, मराठी, हिंदी, गुजराथी व इंग्रजी या भषांवरील असामान्य प्रभुत्व, वैदिक, ज्योतिष इत्यादी शास्त्रांचा सखोल अभ्यास, योग व मंत्र शास्त्रातील प्रत्यक्ष घेतलेले अनुभव, विविध क्षेत्रांतील व्यावहारिक जगतात वावरताना आलेले कटुतर अनुभव, व अनेक वर्षे केलेली खडतर अनुष्ठाने, पुरश्चरणे व तपश्चर्या, यात्रादि निमित्ताने केलेले भरत खंडातील सूक्ष्मावलोकनपूर्वक पर्यटण, इत्यादीच्या योगे त्यांच्या ठिकाणी ज्ञान, वैराग्य, योग व पराभक्ती यांचा आदर्श समन्वय झाला होता.

        चतुर्थाश्रम घेतल्यावर चास-कमान, इस्लामपूर, सातारा, सांगली, माधवनगर, कुंडल, परांडा, गंगाखेड, मुंबई, पुणे, नाशिक, उस्मानाबाद वगैरे निरनिराळ्या ठिकाणी श्रींचे वास्तव्य झाले. पण १९५९ पासून मुख्यतः परांडा येथेच वास्तव्य झाले. परंड्याला श्रीसमर्थ शिष्य कल्याणस्वामी, नाथपंथीय कवी श्रीनाथभुजंग, सुप्रसिद्ध वेदांती संतकवी श्रीहंसराजस्वामी, समर्थभक्त प. पू. श्री. अनंतदास इत्यादी अनेक संतांनी वास्तव केल्याने त्यास संतभूमीचा गौरव प्राप्त झाला आहे. या भूमीत स्वामी रमले.

दीपस्तंभाप्रमाणे अनेकांच्या ऐहिक, पारमार्थिक जीवनांत त्यांनी मार्गदर्शन केले व शेवटी देहाचे नियोजित कार्य पार पडल्याने, प्रायोपवेशनपूर्वक देहविसर्जनाचा कठोर निर्णय त्यांनी घेतला व सतत दहा दिवस अन्नपाणी वर्ज्य करून, फाल्गुन वद्य १० शके १८९० (दि. २३ मार्च १९६८) या पुण्यदिवशी ते समाधिस्त झाले. परांडा येथेच त्यांची समाधी असून पुण्यतिथीस तेथे मोठा उत्सव होत असतो.

 अध्याय २ रा  ,  अध्याय ३ रा

आपल्या सूचना व अभिप्राय कळल्यास संकेतस्थळ उपयुक्त बनण्याचा प्रयत्न करता येईल.

जीमेलच्या (i.e. @gmail.com)  च्या  

raamapremi   या  ID  वर.


Sign in  |  Recent Site Activity  |  Terms  |  Report Abuse  |  Print page  |  Powered by Google Sites